India opened another gate of salal dam built on chenab river
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
भारताने पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकने पाकिस्तानची चांगलीच दाणादाण उडवून दिली. एवढ्यावरच न थांबता भारताने चिनाब नदीवर बांधलेल्या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडून पाकिस्तानमध्ये पूरसदृष्य परिस्थिती निर्माण करत पाणी-पाणी केले. भारताने केलेल्या या अनपेक्षित कारवाईने पाकिस्तान चांगलाच गांगरून गेला आहे.
भारताने चिनाब नदीवर बांधलेल्या धरणाचा एक दरवाजा उघडला आहे. जम्मू काश्मीरच्या रियासीमध्ये चिनाब नदीवर असलेल्या सलाल धरणाचा आणखी एक दरवाजा भारताने उघडला. या आधी बगलिहार बांधाचे अणेक दरवाजे खोलण्यात आले होते. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधु जल करार स्थगित केला आहे.
यानंतर भारताने चिनाब नदीचे पाणी थांबवले होते. या आधी पहिला बगलिहार धरण आणि नंतर सलाल धरणाचे दरवाजे बंद करून पाकिस्तानची पाणीबाणी केली होती. दरम्यान जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या पावसामुळे धरणातील पाण्याची पातळी वाढली होती. यानंतर रामबनमध्ये चिनाब नदीवर असलेल्या बगलिहार हायड्रोइलेक्ट्रीक पावर प्रोजेक्टचे दरवाजे उघडण्यात आले होते. या शिवाय चिनाब नदीवरील असलेल्या रियासातील सलाल धरणाचे तीन गेट उघडण्यात आले होते.
पहलगाममध्ये निष्पाप भारतीय पर्यटकांवर झालेल्या क्रुर हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत असलेला पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर भारताने सिंधु पाणी करार स्थगित केला होता. हा सिंधू पाणी करार जागतिक बँकेने केला होता. या करारावर १९६० मध्ये तत्कालीन भारतीय पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि तत्कालीन पाकिस्तानी राष्ट्रपती अयुब खान यांनी स्वाक्षरी केली होती.
सिंधु नदी प्रणालीमध्ये ६ नद्या ज्यामध्ये सिंधु, झेलम, चिनाब, रावी, ब्यास आणि सतलज या नद्यांचा समावेश आहे. सिंधु पाणी वाटप करारानुसार, पूर्वेकडील नद्या ज्यामध्ये रावी, ब्यास आणि सतलज नदीच्या पाण्यावरचा अधिकार भारताला मिळाला होता. तर सिंधु, झेलम आणि चिनाब नद्यांचा पाण्याचा अधिकार पाकिस्तानला मिळालेला होता.