भारतामधील इराणी राजदूत मोहम्मद फताली.  
राष्ट्रीय

IRIS Dena Warship Incident | "भारताने आम्हाला खरोखरच मोठी मदत केली" : 'IRIS देना' वरील वादावर इराणी राजदूतांचा पूर्णविराम

IRIS Dena Warship Incident |अमेरिकेने बुडवली होती इराणची युद्धनौका, विशाखापट्टणम येथून परतत असताना लक्ष्य केल्‍याने निर्माण झाला होता वाद

पुढारी वृत्तसेवा

IRIS Dena Warship Incident

नवी दिल्‍ली : बहुराष्ट्रीय नौदल सराव संपवून परतत असताना ४ मार्च रोजी अमेरिकेने इराणची युद्धनौका 'आयआरआयएस देना' (IRIS Dena) टॉर्पिडो मारून बुडवली होती. या हल्ल्यात १०० हून अधिक कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. ही घटना भारताच्या प्रभावक्षेत्रात घडल्याने आणि युद्धनौका विशाखापट्टणम येथून परतत असताना लक्ष्य करण्यात आल्याने भारतात मोठा वाद निर्माण झाला होता. मात्र, भारतामधील इराणी राजदूत मोहम्मद फताली यांच्या वक्तव्याने आता या वादाला पूर्णविराम मिळाला आहे.

भारताने सर्वतोपरी मदत केली : मोहम्‍मद फताली

'इंडिया टूडे'शी बोलताना मोहम्मद फताली म्हणाले, "भारत सरकारने आम्हाला खरोखरच मोठी मदत केली आहे. मी फक्त इराण आणि भारताबद्दल बोलेन. मी भारताचा इराणी राजदूत आहे. तिसऱ्या देशाबद्दल (श्रीलंका) मी भाष्य करणार नाही. एक राजदूत म्हणून मला प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने पाहावे लागते. या जहाजांच्या बाबतीत भारत सरकारने आम्हाला मोलाचे सहकार्य केले. त्यांनी आमची विनंती मान्य केली, पण दुर्दैवाने इतर काही देशांनी सहकार्य करण्यास नकार दिला."

इराण कोणतीही कारवाई प्रत्युत्तराशिवाय सोडत नाही

"या सर्वाचा विचार करता, आम्ही निश्चितपणे अमेरिकेला चोख प्रत्युत्तर देऊ. त्यातील काही भाग आम्ही पूर्ण केला आहे. लवकरच तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. इराण कोणतीही कारवाई प्रत्युत्तराशिवाय सोडत नाही," असा इशाराही त्यांनी दिला.

कोचीमध्ये 'आयआरआयएस लावन'ला आश्रय

'आयआरआयएस देना' बुडवली गेली असतानाच, भारताने ४ मार्च रोजी इराणच्या दुसऱ्या युद्धनौकेला, 'आयआरआयएस लावन' (IRIS Lavan) ला कोचीमध्ये आश्रय दिला होता. 'आयआरआयएस लावन'मधील १८३ पैकी ५० कर्मचारी कोचीमध्येच थांबले असून, उर्वरित कर्मचाऱ्यांना भारताने मायदेशी रवाना केले आहे.

श्रीलंकेचे खासदार नामल राजपक्षे काय म्‍हणाले?

श्रीलंकेचे खासदार नामल राजपक्षे 'आयआरआयएस देना' बाबत बोलताना म्‍हणाले होते की, "या घटनेने आंतरराष्ट्रीय कायदा आणि हिंदी महासागरातील बड्या देशांच्या वर्तनावर मूलभूत प्रश्न उपस्थित केले आहेत. याच्या कायदेशीरतेवर तज्ज्ञ चर्चा करू शकतात, परंतु हिंदी महासागरात पाळली जाणारी नैतिक मूल्ये आणि पद्धती नक्कीच पायदळी तुडवल्या गेल्या आहेत."

वादाचे कारण काय होते?

संरक्षण तज्ज्ञांच्या मते, इराणच्या युद्धनौकेवरील या हल्ल्याने 'इराण युद्ध' भारताच्या दारापर्यंत आणले आहे. ही घटना श्रीलंकेच्या गालेपासून ४० नॉटिकल मैल दक्षिणेला आंतरराष्ट्रीय समुद्रात घडली. टीकाकारांच्या मते, हा हल्ला भारताच्या सागरी अधिकारक्षेत्रात झाला नसला तरी तो भारताच्या प्रभावक्षेत्रात झाला आहे. माजी परराष्ट्र सचिव कन्वल सिबल यांनी 'X' वर पोस्ट केले होते की, "जर आपण त्या जहाजाला सरावासाठी आमंत्रित केले नसते, तर ते तिथे नसते. या हल्ल्याला भारत राजकीय किंवा लष्करीदृष्ट्या जबाबदार नसला तरी, आपली जबाबदारी नैतिक आणि मानवी स्तरावर आहे." दरम्‍यान, आता इराणच्या राजदूतांनी भारताच्या भूमिकेचे समर्थन केल्यामुळे ५ मार्च रोजी युद्धनौका बुडवल्यापासून सुरू असलेल्या वादावर आता अधिकृतपणे पडदा पडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT