independence day vijay announces gold ring scheme who will benefit vanakkam to genz
पुढारी ऑनलाईन : मुख्यमंत्री यांनी भ्रष्टाचार निर्मूलन म्हणजेच खरी स्वातंत्र्याची भावना असल्याचे सांगत सरकारी महसूल खासगी हातात जाण्यापासून कठोरपणे रोखण्यात आल्याचे म्हटले. तसेच सर्व विभागांमधून भ्रष्टाचार दूर करण्यासाठी सातत्याने कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी चेन्नईतील फोर्ट सेंट जॉर्ज परिसरात ध्वजारोहण करून मुख्यमंत्री म्हणून आपले पहिले स्वातंत्र्य दिनाचे भाषण केले. आपल्या ऐतिहासिक भाषणाची सुरुवात त्यांनी जेन-झी (Gen Z) पिढीला विशेष शुभेच्छा देत केली. ते म्हणाले, “जगभरात राहणाऱ्या माझ्या सर्व तमिळ बांधवांनो आणि माझ्या जेन-झी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माझा वणक्कम.”
आपल्या भाषणात मुख्यमंत्री विजय यांनी प्रशासकीय बाबींमध्ये केंद्र सरकारला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. मात्र, राज्याच्या अधिकार आणि हितसंबंधांच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही केंद्रीय धोरणाला त्यांचे सरकार ठामपणे विरोध करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विजय म्हणाले, “भ्रष्टाचारमुक्त सरकार स्थापन करण्याच्या ध्येयाने आम्ही मिशन मोडमध्ये काम करत आहोत. जनतेमध्ये भ्रष्टाचाराबाबत शून्य सहनशीलता निर्माण व्हावी, अशी आमची इच्छा आहे.” कोणाचेही नाव न घेता त्यांनी सरकारच्या विरोधात काम करणाऱ्या शक्ती आणि रचले जाणारे कट पूर्णपणे हाणून पाडले जातील, असे सांगितले.
अम्मा कॅन्टीन सुरूच राहणार
राजकीय मतभेद बाजूला ठेवून जनहिताला प्राधान्य देत मागील सरकारांच्या सर्व उपयुक्त योजना पुढेही सुरू ठेवल्या जातील, अशी घोषणा विजय यांनी केली. यामध्ये एआयएडीएमके सरकारची अम्मा कॅन्टीन आणि डीएमके सरकारची शालेय विद्यार्थ्यांसाठीची नाश्ता योजना यांचा समावेश आहे.
15 सप्टेंबरपासून ‘सुवर्ण अंगठी योजना’
द्रविड नेते सी. एन. अन्नादुराई यांच्या जयंतीनिमित्त 15 सप्टेंबरपासून ‘सुवर्ण अंगठी योजने’ची सुरुवात करण्यात येणार आहे. 755.83 कोटी रुपये खर्चाच्या या योजनेअंतर्गत सरकारी रुग्णालयांमध्ये जन्मलेल्या नवजात बालकांना सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली जाणार आहे.
याशिवाय माजी सैनिकांच्या मुलींच्या विवाहासाठी दिली जाणारी आर्थिक मदत 25 हजार रुपयांवरून 50 हजार रुपये करण्यात आली आहे.
दिव्यांग माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना मिळणारी मासिक मदत 5 हजार रुपयांवरून 7 हजार रुपये करण्यात आली आहे. स्वातंत्र्यसैनिकांची मासिक पेन्शन वाढवून 23 हजार रुपये, तर त्यांच्या आश्रितांना मिळणारी कौटुंबिक पेन्शन 12,500 रुपये करण्यात आली आहे.
भाषणाच्या समारोपावेळी मुख्यमंत्री विजय यांनी तमिळनाडूच्या जनतेचे आभार मानले. राज्यातील जनतेने जात, धर्म, पैशाचे आणि बाहुबलाचे राजकारण नाकारून जनकेंद्रित आणि सामाजिक न्यायावर आधारित सरकार स्थापन करण्यासाठी मोठा पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.