Hyderabad News
हैदराबाद: सिकंदराबादमधील चिलकलगुडा परिसरात शुक्रवारी एका २३ वर्षीय बी.टेक विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. प्रेमप्रकरणातून या तरुणाचा पाठलाग करून त्याच्यावर धारदार शस्त्रांनी सपासप वार करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून संतप्त नातेवाईकांनी आरोपींच्या अटकेसाठी जोरदार निदर्शने केली.
जवाहर नगर येथील रहिवासी असलेला यवन (वय २३) हा बी.टेकच्या तिसऱ्या वर्षात शिकत होता. त्याचे सीताफलमंडी येथील एका तरुणीशी गेल्या चार वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, तरुणीच्या कुटुंबीयांचा या नात्याला तीव्र विरोध होता. त्यांनी यवनला यापूर्वी अनेकदा ताकीदही दिली होती. असे असूनही यवन आपल्या मित्रासोबत सीताफलमंडी भागात राहून संबंधित तरुणीच्या संपर्कात होता.
गुरुवारी रात्री यवन चिलकलगुडा येथील एका घरात मित्रांसोबत क्रिकेटचा सामना पाहत होता. त्याचवेळी तीन दुचाकींवरून सहा अज्ञात हल्लेखोर तिथे पोहोचले. त्यांच्या हातात चाकू आणि इतर शस्त्रे होती. त्यांनी घरात घुसून यवनवर हल्ला केला.
हल्लेखोरांना पाहून यवनने स्वतःचा जीव वाचवण्यासाठी घरातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, हल्लेखोरांनी त्याचा पाठलाग केला आणि रस्त्यात गाठून त्याच्या डोक्यावर, मानेवर आणि शरीराच्या इतर भागांवर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या यवनला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या हत्येनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. शुक्रवारी सकाळी यवनच्या पालकांनी आणि मित्रांनी सीताफलमंडी येथील संबंधित तरुणीच्या घराबाहेर जोरदार निदर्शने केली. "हा खून तरुणीच्या कुटुंबीयांनीच घडवून आणला आहे," असा आरोप करत आरोपींना आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी आंदोलकांनी केली. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ नये म्हणून पोलिसांनी घटनास्थळी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.