Tamil Nadu Election TVK Government Formation Scenarios: तामिळनाडूच्या राजकारणात यावेळी मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. अनेक दशकांपासून सुरू असलेला द्रविड पक्षांचा दबदबा मोडीत काढत अभिनेता ते राजकारणी झालेल्या विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षाने 108 जागा जिंकल्या आहेत. पहिल्याच निवडणुकीत एवढं यश मिळवल्यानंतरही, पक्षाला स्पष्ट बहुमतापासून काही पावलं दूर राहावं लागलं आहे.
234 सदस्यीय विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी 118 जागांची गरज असते. मात्र, टीव्हीकेकडे सध्या 108 जागा आहेत. त्यातही विजय यांनी दोन मतदारसंघांतून विजय मिळवला असल्याने त्यांना एक जागा सोडावी लागणार आहे. त्यामुळे पक्षाची संख्या आणखी कमी होईल. याशिवाय सरकार स्थापन झाल्यास एक आमदार सभापती (स्पीकर) बनतो, ज्यामुळे मतदानात त्याचा सहभाग नसतो आणि प्रभावी ताकद आणखी घटते. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी टीव्हीकेला किमान 12 आमदारांचा अतिरिक्त पाठिंबा आवश्यक आहे.
या पार्श्वभूमीवर टीव्हीकेसमोर सरकार स्थापनेसाठी तीन प्रमुख पर्याय असल्याची चर्चा सुरू आहे. पहिला पर्याय म्हणजे डीएमके आघाडीतील छोट्या पक्षांना सोबत घेऊन सरकार स्थापन करणे. यात काँग्रेस, डाव्या पक्षांसह IUML आणि VCK यांचा पाठिंबा मिळू शकतो.
TVK -108
कांग्रेस -5
लेफ्ट-4
IUML-2
VCK -2
दुसरा पर्याय म्हणजे डीएमके आणि एआयएडीएमके या दोन्ही आघाड्यांतील छोट्या पक्षांना एकत्र आणून सरकार स्थापन करणे. या समीकरणात काँग्रेस, पीएमके, IUML आणि डावे पक्ष यांचा समावेश होऊ शकतो. या पर्यायामुळे स्थिर सरकार उभं करण्यासाठी सर्व घटक पक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचाही विचार सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
TVK -108
कांग्रेस -5
PMK -4
IUML -2
LEFT -4
तिसरा पर्याय म्हणजे एआयएडीएमकेचा थेट पाठिंबा घेऊन मजबूत सरकार स्थापन करणे. या समीकरणात टीव्हीकेच्या 108 जागांबरोबर एआयएडीएमकेच्या 47 जागा मिळाल्यास स्पष्ट बहुमत मिळू शकतं.
TVK -108
AIADMK-47
या सगळ्या घडामोडींमध्ये छोट्या पक्षांची भूमिका ‘किंगमेकर’ म्हणून महत्त्वाची ठरणार आहे. काँग्रेस, डावे पक्ष, IUML, VCK तसेच पीएमके आणि इतर पक्षांकडे मर्यादित जागा असल्या तरी ते सत्ता स्थापनेत निर्णायक ठरू शकतात.
दरम्यान, राज्यपाल राजेंद्र अर्लेकर लवकरच सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू करू शकतात. ते विजय यांना सरकार स्थापनेचा दावा सादर करण्यासाठी आणि बहुमत सिद्ध करण्यासाठी आमंत्रित करू शकतात. जर टीव्हीकेला बहुमत सिद्ध करता आलं नाही, तर दुसऱ्या क्रमांकाच्या पक्षाला संधी दिली जाऊ शकते. आणि जर कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकला नाही, तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता आहे.
एकूणच, तामिळनाडूमध्ये सत्तास्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून पुढील काही दिवस राज्याच्या राजकारणासाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.