Hormuz Strait India UK meeting
नवी दिल्ली : संपूर्ण जगाचे लक्ष वेधलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव निवळण्यासाठी आणि व्यापार मार्ग पुन्हा सुरळीत करण्यासाठी ब्रिटनने पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ब्रिटनने भारतासह अनेक देशांना निमंत्रित केले असून, परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी उच्चस्तरीय बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी आज ( दि. २) या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
मध्यपूर्वेतील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता, भारतानेही या भागात आपली सक्रियता वाढवली आहे. भारतीय जहाजांची वाहतूक विनासायास आणि सुरक्षित व्हावी, यासाठी भारत इराणसह संबंधित प्रादेशिक देशांशी सातत्याने संवाद साधत आहे. जैस्वाल यांनी सांगितले की, "आम्ही इराण आणि इतर संबंधित देशांच्या संपर्कात आहोत, जेणेकरून आपल्या जहाजांना सुरक्षित मार्ग उपलब्ध होईल." भारताच्या या मुत्सद्दी प्रयत्नांना यश मिळत असून, गेल्या काही दिवसांत सहा भारतीय जहाजे होर्मुझ सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे मार्गस्थ झाली आहेत.
सध्या मध्यपूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे इराणने होर्मुझ सामुद्रधुनीबाबत कठोर भूमिका घेतली असली तरी, भारताच्या मालवाहू जहाजांना मात्र विशेष सवलत देण्यात आली आहे. भारत हा अशा मोजक्या देशांपैकी एक आहे, ज्यांच्या जहाजांना या मोक्याच्या जलमार्गावरून जाण्यास परवानगी मिळाली आहे. यामध्ये भारताच्या घरगुती वापरासाठी अत्यंत आवश्यक असलेल्या एलपीजी (LPG) आणि एलएनजी (LNG) सारख्या ऊर्जा संसाधनांचा समावेश आहे.दरम्यान, इराणला कोणतीही 'टोल' किंवा शुल्क भरून ही जहाजे मार्गस्थ होत आहेत का, याबाबतच्या चर्चांना परराष्ट्र मंत्रालयाने पूर्णविराम दिला आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही 'टोल' प्रणालीचे वृत्त मंत्रालयाने फेटाळून लावले आहे.