प्रातिनिधिक छायाचित्र. file photo.
राष्ट्रीय

Honour killing | गुजरातमध्ये 'सैराट'चा थरार; वडील आणि भावाने केली प्रेमी युगुलाची हत्या

Honour killing |तब्बल ४० दिवसांनंतर गुन्‍ह्याचे गूढ उकलले, संशयितांनी केला पोलीस तपास भरकटवण्याचाही प्रयत्न

पुढारी वृत्तसेवा

Honour killing Gujarat

राजकोट : गुजरातमध्ये एका प्रेमी युगुलाच्या गूढ बेपत्ता होण्यामागील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ही केवळ बेपत्ता होण्याची घटना नसून, एक क्रूर 'ऑनर किलिंग' असल्याचे उघड झाले आहे. १९ वर्षीय तरुणीच्या वडिलांनीच लग्नाला विरोध असल्याने या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे.

४० दिवसांनंतर विहिरीत आढळले मृतदेह

३ फेब्रुवारीपासून बेपत्ता असलेल्या नवीन रबारी (२४) आणि नथी ऊर्फ सोनू रबारी यांचे कुजलेले मृतदेह शुक्रवारी (दि. १३) रात्री नखत्राणा तालुक्यातील खांभला गावाजवळील एका विहिरीतून बाहेर काढण्यात आले. तब्बल ४० दिवसांनंतर ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सोनूचे वडील वंका ऊर्फ राजा रबारी आणि त्याचा पुतण्या सोमा ऊर्फ पर्वत रबारी यांना अटक केली आहे. तसेच सोनूची आई हिमा हिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाजात बदनामी होईल या भीतीने वंका आणि सोमा यांनी या प्रेमी युगुलाची हत्या करण्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

असा उघड झाला गुन्हा

'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार, ३ फेब्रुवारी रोजी नवीन सोनूला भेटायला गेला. त्यानंतर तो परतलाच नाही. नवीनच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला असता सोनूच्या वडिलांनी ती घरी नसल्याचे आणि दोघेही काही दिवसांत परत येतील, असे सांगितले. शोध घेत असताना नवीनची दुचाकी कोटडा गावातील क्रिकेटच्या मैदानावर सापडली. त्यानंतर ५ फेब्रुवारी रोजी नवीनचा भाऊ राहुल याने नखत्राणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी ठेवली मुलीच्या कुटुंबावर पाळत

डीएसपी विकास सुंडा यांनी सांगितले की, "ऑनर किलिंगचा संशय असल्याने आम्ही मुलीच्या कुटुंबावर पाळत ठेवून होतो. तांत्रिक माहिती आणि संशयितांच्या चौकशीतून मृतदेह विहिरीत टाकल्याचे समजले. शुक्रवारी पोलीस, अग्निशमन दल आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. वंका आणि त्याच्या साथीदाराने दोघांचा गळा दाबून खून केला आणि पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत फेकून दिले होते. मृतदेह पूर्णपणे कुजलेले असूनही, राहुलने कपड्यांवरून नवीनची ओळख पटवली.

दोघांची हत्या, मृतदेह दुचाकीवरून विहिरीत नेऊन टाकले

नवीन आणि सोनू गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते. ३ फेब्रुवारी रोजी ते पुन्हा भेटले. संध्याकाळपर्यंत सोनू घरी न परतल्याने वडिलांनी तिला फोन केला, तेव्हा तिने घरी येण्यास नकार दिला आणि नवीनशी लग्न करणार असल्याचा हट्ट धरला. यानंतर वंका आणि सोमा त्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला. बाचाबाची वाढली आणि त्याचे रूपांतर हिंसेत झाले. सोमाने सोनूचा गळा दाबला, तर वंकाने नवीनचा गळा दाबून दोघांची जागीच हत्या केली. त्यानंतर त्यांनी एकामागून एक मृतदेह दुचाकीवरून नेऊन विहिरीत टाकले.

तपासाची दिशा भरकटवण्याचा प्रयत्न

गुन्हा लपवण्यासाठी वंकाने दोघांचे मोबाईल २० किमी लांब नेऊन नष्ट केले. विशेष म्हणजे, संशय येऊ नये म्हणून ७ फेब्रुवारीला त्यांनी स्वतः सोनू बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली आणि अनेक वेळा पोलिसांकडे जाऊन तिची चौकशी करण्याचा बनाव केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विरोधामागे समाजातील काही प्रथांचे कारण होते. या समाजात मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी असल्याने 'साटा-लोटा' (बदला विवाह) पद्धत पाळली जाते, जिथे एका कुटुंबातील मुलगा दुसऱ्या कुटुंबातील मुलीशी लग्न करतो. त्या बदल्यात दुसऱ्या कुटुंबातील मुलगा पहिल्या कुटुंबातील मुलीशी लग्न करतो. नवीनला बहीण नव्हती आणि तो बेरोजगार होता, त्यामुळे मुलीच्या कुटुंबाचा या विवाहास तीव्र विरोध होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT