Honeymoon dispute bride seeks divorce AI Photo
राष्ट्रीय

Honeymoon dispute: हम साथ साथ नही हैं! नवरदेवाने हनीमूनला संपूर्ण कुटुंब सोबत नेलं; नववधू संतापली, थेट घटस्फोटाची मागणी केली

लग्नानंतर नवदाम्पत्याच्या आयुष्यातील खास क्षण मानला जाणारा हनीमूनच या जोडप्याच्या वैवाहिक आयुष्यातील वादाचे कारण ठरला आहे.

मोहन कारंडे

Honeymoon dispute bride seeks divorce

मेरठ: 'हम साथ-साथ हैं' या १९९९ मध्ये प्रदर्शीत झालेल्या लोकप्रिय हिंदी चित्रपटातील एका दृश्यासारखी घटना उत्तर प्रदेशातील एका नवविवाहित जोडप्याच्या बाबतीत घडली आहे. मात्र, यामुळे त्यांचे नाते घटस्फोटापर्यंत येऊन ठेपले असून त्यांचे समुपदेशन सुरू आहे. चित्रपटात साधना (तबू) आनंदाने तिचा पती विवेक (मोहनीश बहल) आणि संपूर्ण कुटुंबासोबत हनीमूनला जाते; मात्र या प्रकरणात पतीने आई-वडील आणि भावंडांना सोबत नेऊन त्यांच्या हनीमूनचे रूपांतर एका कौटुंबिक सहलीत केल्याने नववधू संतापली आणि थेट घटस्फोटाची मागणी केली आहे.

लग्नानंतर नवदाम्पत्याच्या आयुष्यातील खास क्षण मानला जाणारा हनीमूनच या जोडप्याच्या वैवाहिक आयुष्यातील वादाचे कारण ठरला आहे. उत्तर प्रदेशातील एका नववधूने पतीविरुद्ध घटस्फोटाची मागणी केली असून, तिचा आरोप आहे की पतीने हनीमूनसाठी जाताना आई-वडील, भाऊ आणि बहिणीलाही सोबत नेले. या घटनेमुळे दोघांमध्ये गंभीर मतभेद निर्माण झाले असून सध्या हे प्रकरण समुपदेशन केंद्रात पोहोचले आहे, असे 'इंडिया टुडे'ने वृत्त दिले आहे.

स्वप्नातील हनीमूनचं रूपांतर कौटुंबिक सहलीत

समुपदेशन केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर नववधूला पतीसोबत एकांतात वेळ घालवून एकमेकांना समजून घेण्याची अपेक्षा होती. मात्र, पतीने हनीमूनच्या प्रवासात संपूर्ण कुटुंबाला सहभागी करून घेतल्याने तिची निराशा झाली. पत्नीच्या मते, हनीमून हा पती-पत्नीच्या नात्याची सुरुवात अधिक घट्ट करण्याचा काळ असतो. परंतु कुटुंबातील सदस्य सतत सोबत असल्याने तिला पतीसोबत स्वतंत्रपणे वेळ घालवण्याची संधीच मिळाली नाही. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होऊ लागले.

पती म्हणतो, 'यात चुकीचं काय?'

मात्र, पतीचा या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे. समुपदेशकांच्या माहितीनुसार, त्याने कुटुंबातील सर्वांना आनंद मिळावा या हेतूने त्यांनाही सहलीला नेले होते. त्याच्या मते, आई-वडील आणि भावंडांना हनीमून ट्रिपमध्ये सहभागी करून घेण्यात काहीच गैर नव्हते. त्यामुळे आपण कोणतीही चूक केलेली नाही, असा त्याचा ठाम दावा आहे. मात्र, दोघांच्या अपेक्षांमधील हा मोठा फरकच आता वैवाहिक नात्यातील प्रमुख अडथळा बनला आहे. नववधूच्या मते हनीमून म्हणजे वैवाहिक जीवनाची एकत्र सुरुवात करण्याची गमावलेली संधी होती, तर नवरदेवाचा असा आग्रह आहे की त्याचे हेतू चांगले आणि कौटुंबिक हिताचे होते.

तीन वेळा समुपदेशन, तरीही तोडगा नाही

या वादावर आतापर्यंत तीन वेळा समुपदेशन झाले आहे, परंतु दोघांमधील मतभेदांची दरी अजूनही कायम आहे. समुपदेशकांनी नुकतेच आणखी एक सत्र घेतले असून, जोडप्याला त्यांच्या भविष्याबाबत विचार करण्यासाठी अतिरिक्त वेळ दिला आहे. वारंवार प्रयत्न करूनही, आतापर्यंत कोणताही तोडगा निघालेला नाही. दोन्हीपैकी कोणीही माघार घेण्यास तयार नसल्यामुळे, हे लग्न आता एका निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे. जर हा पेच कायम राहिला, तर हे प्रकरण घटस्फोटाच्या प्रक्रियेकडे वळू शकते.

विवाह संकेतस्थळावरून जुळलं होतं नातं

या प्रकरणातील महिला मेरठ जिल्ह्यातील रामराज परिसरातील असून ती पदवीधर आहे. तर तिचा पती दिल्लीतील पटेल नगर येथील रहिवासी असून त्याने सिंगापूरमधून हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले आहे. दोघांचे लग्न एका विवाह संकेतस्थळाच्या माध्यमातून ठरले होते. नव्या आयुष्याची आनंददायी सुरुवात करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या जोडप्याच्या नाते सध्या हनीमूनमुळे तुटण्याच्या मार्गावर आले असून समुपदेशक मात्र हे लग्न वाचवण्यासाठी आणखी एक प्रयत्न करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT