पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 31 मार्च 2026 पर्यंत देशातून नक्षलवाद संपविणार असल्याची घोषणा काही दिवसांपुर्वी केली होती. त्या पार्श्वभुमीवर एक आश्वासक माहिती समोर आली आहे. सन 2024 आणि सन 2025 चे पहिले तीन महिने या काळात एकूण 1067 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली आहे.
2024 मध्ये एकूण 787 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली होती. तर 2025 मध्ये पहिल्या तीन महिन्यात 280 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. अशा एकूण 1067 नक्षलवाद्यांनी गेल्या सव्वा वर्षात शरणागती पत्करली आहे. (Naxal surrenders doubles in 2025)
PTI च्या अधिकृत आकडेवारीनुसार, 2024 च्या पहिल्या तीन महिन्यांत (जानेवारी-मार्च) छत्तीसगडमध्ये 124 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली होती. यात इनामी म्हणजे ज्यांच्यावर बक्षीस लावले आहेत असे नक्षली, तसेच गैर-इनामी कॅडर आणि ‘जन मिलिशिया’ सदस्यांचा समावेश होता. तथापि, 2025 च्या याच कालावधीत हा आकडा 280 वर पोहोचला आहे.
केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) च्या विविध मोहिमांमुळे देशात नक्षलवादी शरण येण्याचा वेग वाढला आहे. 2025 मध्ये जानेवारी ते मार्च या काळात नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणात गतवर्षीच्या याच काळापेक्षा दुप्पट वाढ झाली आहे.
सन 2024 मध्ये एकूण 787 नक्षलवाद्यांनी शरणागती पत्करली होती. यातील बहुतांश प्रकरणे केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) आणि त्यांचे विशेष कमांडो युनिट CoBRA च्या प्रयत्नांमुळे घडली होती.
CRPF ने आपल्या गुप्तचर शाखेला सक्रिय करून या नक्षल कॅडर्सना शरणागतीसाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला आहे. विशेषतः छत्तीसगडच्या अत्यंत संवेदनशील भागांमध्ये ही मोहिम चालवली जात आहे. त्याचेच हे यश मानले जात आहे.
CRPF च्या गुप्तचर विभागाला जारी केलेल्या निर्देशानुसार, ‘जन मिलिशिया’ आणि ‘क्रांतिकारी पीपल्स कमिटी’ (RPC) यांचे सदस्य तसेच त्यांच्या समर्थकांची ओळख पटवण्याचे आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) यांच्या विचारसरणीला मुख्य प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
गुप्तचर विभागाला स्थानिक रहिवाशांशी संवाद साधण्यास सांगण्यात आले आहे, जेणेकरून ते CPI (माओवादी) कॅडरच्या सदस्यांना मुख्य प्रवाहात येण्यासाठी प्रोत्साहित करू शकतील.
केंद्र सरकारने मार्च 2026 पर्यंत डाव्या विचारसरणीच्या उग्रवादाचा (Left Wing Extremist) संपूर्ण नायनाट करण्याचे लक्ष्य ठरवले आहे.
जवानांच्या 20 तुकड्या तैनात
CRPF ही नक्षलविरोधी मोहिमेसाठी आघाडीची फोर्स आहे. छत्तीसगडमध्ये या दलाच्या सुमारे 20 पूर्ण तुकड्या तैनात आहेत, तर CoBRA युनिट गुप्तचर माहितीच्या आधारे विशिष्ट ऑपरेशन्स राबवते. प्रत्येक बटालियनमध्ये स्वतंत्र गुप्तचर विभाग आहे, जो माहिती संकलन व विश्लेषणाचे काम करतो.
CRPF च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, गेल्या काही महिन्यांपासून दलाने तीन टप्प्यातील रणनीतीवर काम सुरू केले आहे – नक्षलविरोधी मोहिमा, दुर्गम भागांमध्ये तळ उभारणे, नागरी सुविधा शिबिरे आयोजित करणे आणि अधिकाधिक शरणागती घडवून आणणे.
अधिकाधिक शरणागती म्हणजे कमी हिंसाचार. CRPF ही छत्तीसगडसह संपूर्ण LWE प्रभावित प्रदेशात मोठ्या प्रमाणावर तैनात असलेली फोर्स आहे.
त्यामुळे राज्य पोलिस आणि अन्य केंद्रीय सुरक्षा दलांच्या तुलनेत जास्त आत्मसमर्पण घडवून आणणे स्वाभाविक आहे," असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
केंद्र सरकारच्या नोंदींनुसार, देशातील माओवादी हिंसाचारात 81 टक्के घट झाली असून, नागरी आणि सुरक्षा दलाच्या जवानांच्या मृत्यूचे प्रमाण 85 टक्क्यांनी कमी झाले आहे.
दरम्यान, शनिवारी (दि. 29 मार्च) दंतेवाडा जिल्ह्यात CRPF आणि राज्य पोलिसांसमोर 15 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले. शनिवारी दंतेवाडा जिल्ह्यात CRPF आणि राज्य पोलिसांसमोर 15 माओवादींनी आत्मसमर्पण केले.
यापैकी सात जणांनी CRPF च्या गुप्तचर विभागाच्या सततच्या प्रयत्नांमुळे, चर्चेनंतर मुख्य प्रवाहात सामिल होण्याच्या फायद्यांबाबत दिलेल्या मार्गदर्शनामुळे शरणागती पत्करली," असे एका अधिकाऱ्याने सांगितले.