High Court on Wife's Convenience
अमरावती (आंध्र प्रदेश): वैवाहिक वादाशी संबंधित खटल्यांमध्ये पतीच्या तुलनेत पत्नीच्या सोयीला प्राधान्य दिले पाहिजे, असे स्पष्ट मत नोंदवत आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने घटस्फोटाचा खटला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले. गुंटूर जिल्ह्यातील रेपल्ले येथून हा खटला आता प्रकाशम जिल्ह्यातील ओंगोल येथील कौटुंबिक न्यायालयात चालवला जाणार आहे.
दाम्पत्याचा विवाह २०११ मध्ये झाला. त्यांना दोन मुले आहेत. कौटुंबिक वादांमुळे दोघांमध्ये मतभेद सुरु झाले. पत्नी सध्या ओंगोल येथे आपल्या पालकांकडे राहत आहे. पतीने गुंटूर जिल्ह्यातील रेपल्ले येथील न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, ओंगोल ते रेपल्ले हे अंतर १०० किलोमीटरपेक्षा जास्त असल्याने आणि दोन मुलांची जबाबदारी असल्याने, पत्नीने हा खटला ओंगोल येथे हस्तांतरित करण्याची विनंती उच्च न्यायालयाकडे केली होती.
न्यायाधीश व्ही. गोपाल कृष्ण राव यांनी या याचिकेवर सुनावणी करताना स्पष्ट केले की:"वैवाहिक प्रकरणांच्या सुनावणीत पतीला होणाऱ्या गैरसोयीपेक्षा पत्नीच्या सोयीचा विचार करणे अधिक आवश्यक आहे. याचिकाकर्त्या महिला आपल्या दोन मुलांसह ओंगोल येथे राहत असून, एवढ्या लांबचा प्रवास करणे तिच्यासाठी कठीण आहे. त्यामुळे पतीने रेपल्ले येथील वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश यांच्या न्यायालयात दाखल केलेला एच.एम.ओ.पी. क्र. ८१/२०२० हा खटला ओंगोल येथील कौटुंबिक न्यायालयात वर्ग करावा, असा आदेश न्यायालयाने दिला.
पतीने या हस्तांतरणास विरोध केला होता. पत्नी केवळ वेळकाढूपणा करण्यासाठी हा प्रयत्न करत असल्याचा दावा त्याने केला. तसेच, स्वतः एका खासगी कंपनीत नोकरीला असल्याने आणि कामासाठी वारंवार हैदराबादला जावे लागत असल्याने, खटला ओंगोलला नेल्यास त्रास होईल, असेही त्याने नमूद केले. मात्र, न्यायालयाने पतीची वैयक्तिक उपस्थिती केवळ आवश्यक असेल तेव्हाच अनिवार्य करून त्याला दिलासा दिला, पण खटला हस्तांतरित करण्याचा निर्णय कायम ठेवला.
घटस्फोटाचे प्रकरण गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी, ओंगोल येथील कौटुंबिक न्यायालयाने मुख्य खटल्याची सुनावणी येत्या चार महिन्यांत पूर्ण करून निकाल द्यावा, असे निर्देशही उच्च न्यायालयाने दिले आहेत.