नवी दिल्ली : देशातील जवळपास सर्वच राज्यांमध्ये मान्सून दाखल झाला आहे. पुढील तीन दिवसांत राजस्थान, पंजाब आणि हरियाणातील राहिलेले भागही तो व्यापेल. हवामान विभागातर्फे पुढील पाच दिवस देशभरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
जूनमध्ये देशभरात सरासरीपेक्षा 11 टक्क्यांनी पाऊस कमी झालेला असला तरी सध्या देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. जुलैमध्ये तो सरासरी गाठेल वा ओलांडेल, असे संकेत आहेत. सोमवारी देशभरात अपवाद वगळता सर्वत्र पाऊस झाला. काही ठिकाणी हलका, काही ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार असे त्याचे स्वरूप होते.
देशातील बहुतांश सर्वच राज्यांमध्ये पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, बिहार, झारखंड, हिमाचल, पंजाब, हरियाणा, गुजरात, दक्षिणेकडील राज्ये आणि ईशान्येकडील राज्यांचा समावेश आहे.