नवी दिल्ली : हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणूक भाजपसाठी अवघड मानली जात आहे. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेसने नॅशनल कॉनफरन्ससोबत आघाडी केली आहे. तर हरियाणात काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष (आप) सोबत लढणार असल्याचे सांगितले जात होते. यासाठी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा झाली. मात्र, आता काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने हरियाणात ‘एकला चलो’चा नारा दिला आहे. त्यामुळे हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपला या समीकरणाचा फायदा होण्याची शक्यता आहे. (Haryana Assembly Election 2024)
हरियाणामध्ये विधानसभेच्या ९० जागा आहेत. यापैकी ५ जागा आम आदमी पक्षाला देण्यासाठी काँग्रेस तयार आहे. मात्र, आम आदमी पक्षाला १० जागा पाहिजे आहेत. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी रविवारी (दि. ८ ) हरियाणा काँग्रेस प्रभारी दीपक बाबरिया यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांमध्ये आघाडीबाबत सकारात्मक चर्चा झाली. मात्र, सोमवारी (दि. ९) दुपारी आम आदमी पक्षाने हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.
या अगोदर काँग्रेसने ४१ उमेदवारांची घोषणा केली आहे. यामुळे आता दोन्ही पक्ष वेगळे-वेगळे लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आम आदमी पक्षाने स्वतंत्र लढण्याचा मार्ग स्वीकारल्याने याचा तोटा काँग्रेसला होणार असल्याचे सांगितले जात आहे. कारण काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची व्होट बँक एकच आहे. त्यामुळे याचा थेट फायदा भाजपला होण्याची शक्यता आहे.
रविवारी, काँग्रेसचे हरियाणा प्रभारी दीपक बाबरिया यांची भेट घेतल्यानंतर ‘आप’चे खासदार राघव चढ्डा म्हणाले की, १२ सप्टेंबर नामांकनाची अंतिम तारीख आहे. त्यामुळे १२ तारखेच्या अगोदर आम्ही निर्णय घेऊ, असे ते म्हणाले होते. त्यामुळे जरी आम आदमी पक्षाने आता २० उमेदवारांची यादी जारी केली असली. तरीही काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये निवडणूकपूर्व आघाडीचे दरवाजे खुले आहेत. दुसरीकडे अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष काँग्रेसकडे ५ जागांची मागणी करत आहे. काँग्रेस ‘सपा’ला २ जागा देण्यास तयार आहे.
दुष्यंत चौटाला यांच्या जननायक जनता पक्षाने चंद्रशेखर यांच्या आझाद समाज पक्षासोबत आघाडी केली आहे. जेजेपी ७० आणि आझाद समाज पक्ष २० जागांवर निवडणूक लढणार आहे. या अगोदर जेजेपी आणि भाजपची आघाडी होती. दुष्यंत चौटाला हे भाजप सोबत सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते. मात्र, त्यांनी राजीनामा देऊन स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. जेजेपीच्या या निर्णयामुळे भाजपला तोटा होणार आहे.