आग्रा, वृत्तसंस्था : छत्रपती शिवाजी महाराज आग्ऱ्यामध्ये ज्या ठिकाणी कैदेत होते आणि जिथून त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेने व गनिमी काव्याने ऐतिहासिक सुटका करून घेतली, त्या ठिकाणी शिवरायांचे भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केली. तसेच एनसीआरटीच्या पुस्तकांत मुघलांचा इतिहास नाही; तर छत्रपती शिवरायांच्या साहसी पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास शिकवला जाईल. शिवरायांच्या इतिहासावर 20 पाने या नव्या पुस्तकांमध्ये देण्यात येत आहेत. हे पंतप्रधान मोदी यांच्यामुळे शक्य झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. आग्ऱ्याच्या ऐतिहासिक लाल किल्ल्यात आयोजित करण्यात आलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या दिमाखदार सोहळ्यात ते बोलत होते.
यावेळी मंचावर राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील, उत्तर प्रदेशचे मंत्री योगेंद्र उपाध्याय, राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार आणि या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक विनोद पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, छत्रपती शिवरायांच्या स्मारकासाठी महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश सरकार यासाठी संयुक्तपणे काम करत आहे.
या ऐतिहासिक जागेच्या अधिग्रहणासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून अत्यंत तत्परतेने निर्णय घेतला, याबद्दल त्यांचे व उत्तर प्रदेश सरकारचे विशेष आभार. सध्या या अधिग्रहणाची कायदेशीर कारवाई अंतिम टप्प्यात आली असून, पुढील वर्षी जेव्हा आपण शिवजयंतीसाठी येथे येऊ, तेव्हा त्या ठिकाणी प्रत्यक्ष स्मारक उभारणीची तयारी सुरू झालेली असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याच्या देदीप्यमान इतिहासासाठी केवळ एकच परिच्छेद दिला होता, असे सांगत फडणवीस म्हणाले, पंतप्रधान मोदींमुळे शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची 20 पाने अभ्यासक्रमात सहभागी करण्यात आली आहेत.
शिवरायांच्या शौर्याचे दर्शन
आग्रा येथील या शिवजयंती सोहळ्यात पुण्यातील विवेक पाटील यांनी आग्रा किल्ला, उत्तर प्रदेश येथे निऑन लाईट्स आणि लेझर शोच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे व कार्यकर्तुत्वाचे दर्शन घडविणाऱ्या प्रसंगांचे भव्य सादरीकरण केले.