पुढारी ऑनलाईन डेस्क: मान्सूनने संपूर्ण भारताचा मैदानी प्रदेश व्यापला आहे. ६ दिवस आधीच नैऋत्य मान्सून वारे संपूर्ण देशात पोहचले आहे. मान्सून सक्रिय झाला असून, काही राज्यांत अतिवृष्टी ते अतिमुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
आसामसह ईशान्य भारतातील अनेक राज्यात सध्या पावसाने थैमान घातले आहे. दरम्यान पुढील दोन दिवस ४ जुलै ते ६ जुलै दरम्यान ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय या राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर भारतातील उत्तराखंडमध्ये देखील रेड अलर्ट असून, अतिवृष्टीची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
उप हिमालय, पश्चिम बंगाल, सिक्कीम (४ ते ६ जुलै), बिहार (४ आणि ५ जुलै), अरुणाचल प्रदेशमध्ये (४ जुलै ते ८ जुलै), आसाम, मेघालय (७ जुलै, ८ जुलै), नागालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरा या राज्यात ४ जुलै आणि ५ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान याठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मध्य महराष्ट्रासह घाट क्षेत्रात ८ जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे.