दिल्लीतील मालवीय नगर येथे घडलेल्या भीषण अग्निकांड प्रकरणातील सर्व २१ मृतांची ओळख पटवण्यात आली आहे.  Pudhari
राष्ट्रीय

Delhi Restaurant Fire | मुंबईत शिक्षण, 'इंडक्शन'साठी दिल्लीत आली अन् मृत्यूने गाठले

दिल्लीतील अग्निकांडात मृत्युमुखी पडलेल्या 'TISS'च्या विद्यार्थिनीसह २१ जणांची ओळख पटली

पुढारी वृत्तसेवा

Delhi Restaurant Fire : दक्षिण दिल्लीच्या मालवीयनगर भागात बुधवारी (दि. ३) सकाळी एका हॉटेलमध्ये लागलेल्या भीषण आगीत किमान २१ जणांचा होरपळून मृत्यू झाला. सर्व २१ मृतांची ओळख पटवण्यात आली आहे. या दुर्घटनेतील मृतांमध्ये मुंबईतील एका तरुणीसह गुरुग्राममधील एकाच कुटुंबातील ८ जणांचा समावेश आहे.

मुंबईतील 'TISS' संस्थेच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसची विद्यार्थिनी श्रुतिका बरणवाल हिचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ Social सायन्सेस संस्थेने शोकसंदेशात म्हटले आहे, "आमच्या 'वॉटर पॉलिसी अँड गव्हर्नन्स प्रोग्राम' (२०२४-२०२६) ची विद्यार्थिनी श्रुतिका बरणवाल हिच्या अकाली निधनाने संपूर्ण टीआयएसएस कुटुंबाला धक्का बसला आहे." मूळची झारखंडची असलेली श्रुतिका नुकतीच पदवीधर झाली होती आणि नोकरीच्या इंडक्शन प्रोग्रामसाठी ('ओळख कार्यक्रम') दिल्लीत आली होती.

पासपोर्ट आणि DNA प्रोफाइलिंगद्वारे ओळख

घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या पासपोर्ट्सच्या आधारे दिल्ली पोलिसांनी या सर्व परदेशी नागरिकांची ओळख पटवली आहे. संबंधित देशांच्या दूतावासांकडून रीतसर परवानगी मिळाल्यानंतर पोलिसांनी या सर्व १२ परदेशी नागरिकांचे 'DNA प्रोफाइलिंग' पूर्ण केले. तसेच दूतावासांची अधिकृत संमती मिळाल्यानंतरच सर्व मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले.

वडिलांचा निरोप घेण्यासाठी आले अन् स्वतःच जगाचा निरोप घेतला

मृतांमध्ये गुरुग्रामच्या एकाच कुटुंबातील ८ जणांचा समावेश आहे, जे रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत असलेल्या आपल्या वृद्ध वडिलांना भेटण्यासाठी आले होते. मृत्युमुखी पडलेल्या गुरुग्रामच्या कुटुंबातील सदस्यांची ओळख पटली आहे. यामध्ये विवेक अग्रवाल (४५, चार्टर्ड अकाउंटंट आणि खाजगी कंपनीचे संचालक), त्यांची पत्नी तर्जनी (४३, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत कार्यरत), मुलगी जिविशा (२०) आणि दुसरी मुलगी वरिया (१८) यांचा समावेश आहे. याशिवाय विवेक यांच्या मातोश्री प्रेमलता (७१), काका अशोक, काकू कमला गोयल आणि त्यांचे पती झवेरी लाल गोयल (दोघेही अजमेर, राजस्थानहून आलेले) यांचाही या आगीत होरपळून मृत्यू झाला. हे सर्वजण विवेक यांचे ७७ वर्षीय वडील राधे श्याम अग्रवाल यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून ते मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

मृतदेह मायदेशी पाठवण्याची प्रक्रिया सुरू

परदेशी नागरिकांचे मृतदेह त्यांच्या मूळ देशांमध्ये परत पाठवण्याची कायदेशीर आणि प्रशासकीय प्रक्रिया सोपी व जलद व्हावी, यासाठी दिल्ली पोलिसांनी या सर्व नागरिकांची यादी परराष्ट्र मंत्रालयाकडे (MEA) सुपूर्द केली आहे. लवकरच हे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्त केले जातील, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT