Chennai AC lounges for delivery agents India first delivery rest lounges
चेन्नई : डिलिव्हरी बॉईज, फूड, ग्रोसरी व पार्सल पोचवणारे गिग कामगार यांची एक मोठी अर्थव्यवस्थाच गेल्या काही काळात उदयास आलेली आहे.
हे डिलिव्हरी बॉईज किंवा गर्ल्स घोळक्याने चौकात थांबलेले, रेस्टॉरंटबाहेर उन्हात उभे राहिलेले, मोबाईल चार्ज करत कुठेतरी उभे असलेले किंवा पाराच्या कडेला टेकलेले हे दृश्य नेहमीच नजरेला पडत असते. तथापि, चेन्नई या महानगरात मात्र हे दृश्य हळूहळू मागे पडणार आहे.
देशात प्रथमच ग्रेटर चेन्नई महानगरपालिकेने (Greater Chennai Corporation) डिलिव्हरी एजंटांसाठी खास वातानुकूलित विश्रांती केंद्रे (AC Rest Lounges) सुरू केली आहेत.
अन्न, किराणा आणि पार्सल डिलिव्हरी करणाऱ्या गिग वर्कर्ससाठी ही एक दिलासादायक आणि सन्मानजनक सुविधा आहे. जिथे त्यांना थोडाकाळ थांबून शीतलता आणि सुरक्षितता मिळणार आहे.
ही केंद्रे केवळ विश्रांतीसाठी नसून, कामाच्या तणावातून मुक्त होण्यासाठी, सुरक्षिततेसाठी आणि सन्मानाने थोडा वेळ घालवण्यासाठी एक हक्काची जागा ठरत आहेत. ही योजना पायलट प्रोजेक्ट म्हणून सुरू करण्यात आली असून, यासाठी सुमारे 25 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
एका वेळेस 25 व्यक्तींना बसण्याची सुविधा
स्वच्छ पिण्याचे पाणी
मोबाईल चार्जिंग पॉईंट्स
स्वच्छतागृहे
आधुनिक स्कँडिनेव्हियन (Scandinavian) शैलीतील आकर्षक डिझाईन
चेनईमध्ये खूप गरमी असते. डिलिव्हरी करून पार्कमध्ये बसून थोडा वेळ घालवायचो. आता हे वातानुकूलित केंद्र मिळालंय, त्यामुळे शांत वाटते.”
पूर्वी एखाद्या रेस्टॉरंटबाहेर थांबायला लागायचे. कुठे बसायला, पाणी प्यायला जागा नव्हती. आता हे लाऊंज मिळाले असल्याने रात्रीही सुरक्षित वाटतं. मुख्यमंत्र्यांनी आमची अडचण समजून ही सुविधा दिली यासाठी आभार, अशी प्रतिक्रिया स्थानिक डिलिव्हरी बॉईज आणि डिलिव्हरी गर्ल्समधून व्यक्त होत आहेत.
तामिळनाडूमध्ये सध्या द्रमुकचे सरकार आहे. मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री थंगम थेन्नारासु यांनी अर्थसंकल्पात चेनई आणि कोईम्बतूरमध्ये अशा केंद्रांची घोषणा केली होती.
चेनईत ही यशस्वी सुरुवात झाल्यानंतर, आणखी ठिकाणी अशी केंद्रे सुरू करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.
भारतात gig economy वर अवलंबून असलेल्या शहरांमध्ये चेन्नईचा हा उपक्रम इतर शहरांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. केवळ आरामदायक सुविधा देणं नव्हे, तर अशा केंद्रांमधून या कामगारांना दिला जाणारा सन्मान, सुरक्षितता आणि प्रतिष्ठा हाच खरा या योजनेचा गाभा आहे.