राष्ट्रीय

 लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून काँग्रेस आपमध्ये पुन्हा जुंपली

दिनेश चोरगे

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : विरोधकांच्या इंडिया आघाडीचा संयोजक कोण असेल, जागावाटप कसे होईल, याचे काहीच सोयरसुतक नसताना इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि आपमध्ये पुन्हा भांडणे सुरु झाली आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंतसिंह मान यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेनंतर काँग्रेसने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कान टोचल्यानंतर भगवंतसिंह मान यांचा सुर मात्र बदलला आहे. तत्पुर्वी आगामी लोकसभा निवडणुकीत पंजाबमध्ये काँग्रेससोबत युती करण्यास मान यांचा विरोध होता.

इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या आणि पंजाबमध्ये प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससोबत आगामी लोकसभा निवडणुकीत युती करण्यास मान यांचा विरोध होता. विरोध करताना दिल्ली आणि पंजाबमध्ये माता भगिनी आपल्या मुलांना काही दिवसांनी सांगतील, 'एक होती काँग्रेस' अशी जहरी टीका भगवंतसिंह मान यांनी केली होती. तसेच काँग्रेस किती राज्यात शिल्लक आहे, असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला होता. यानंतर काँग्रेसनेही तेवढेच कडक प्रत्युत्तर देत भगवंतसिंह मान यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. येणाऱ्या काळात माताभगिनी आपल्या मुलांना सांगतील की, 'एक पक्ष होता तो अलीकडे तिहारमध्ये दिसतो.' अशी जळजळीत टीका काँग्रेस नेते माजी खासदार संदीप दीक्षित यांनी केली आहे.

संदीप दीक्षित म्हणाले की, सार्वजनिकरित्या बोलत असताना कसे बोलले पाहिजे, याचे कुठलेही ज्ञान आम आदमी पक्षाकडे नाही. कुठल्याही मोठ्या आघाडीमध्ये येताना काय केले पाहिजे, हेही त्यांना माहिती नाही. केंद्र सरकार, दिल्लीचे नायब राज्यपाल, विरोधी पक्ष अशा कोणासोबतच काम करण्याचा अनुभव आम आदमी पक्षाकडे नाही. केवळ सर्वांना विरोध करणे हेच एक काम ते करत असतात, असेही ते म्हणाले. आम आदमी पक्षाचे ४० टक्के नेते तुरुंगात आहेत आणि बाकीचे जाण्यास तयार आहेत. असा जोरदार टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, आम आदमी पक्ष एकट्याने लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी सक्षम आहे. असे म्हणत भगवंतसिंह मान यांनी त्यांच्या पक्षाला राज्यनिहाय मिळालेल्या मतदानाची टक्केवारी सांगितली होती. सोबतच आप राष्ट्रीय पक्ष बनलेला सर्वात तरुण पक्ष आहे. सरकार बनवणे आणि चालवणे हे देखील आम्हाला चांगले माहिती आहे, असेही ते म्हणाले होते. तर, पंजाबमध्ये आप काँग्रेससोबत युती करण्यास फारसा उत्सुक नाही. काँग्रेसच्याही स्थानिक नेत्यांना आम आदमी पक्षासोबत युती करून लढण्यात स्वारस्य नाही. काँग्रेसच्या काही नेत्यांनी आप- काँग्रेस अशा आघाडीला जाहीर विरोध केला आहे. तर अशा आघाडीचा भाग असण्यापेक्षा घरी बसू, असा आक्रमक पवित्रा काही काँग्रेसच्या नेत्यांनी घेतला. यापूर्वीही काँग्रेस आणि आमच्या अनेक नेत्यांमध्ये खटके उडाले आहेत. दोन्ही बाजूंच्या वरिष्ठ नेत्यांकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आले असले, तरी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली आणि पंजाब मध्ये हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दिली मान यांना समज

नुकतीच आम आदमी पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली. या बैठकीत बोलताना केजरीवाल म्हणाले की, आप लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा भाग आहे. जागावाटपामध्ये मिळणाऱ्या जागांवर आपण चांगली लढत दिली पाहिजे. मिळालेल्या सर्व जागा जिंकण्याचा आपचा प्रयत्न असेल. आप लोकसभा निवडणूक लढवत नसलेल्या राज्यांतील पक्षाचे कार्यकर्ते येतील आणि जिथे निवडणुका लढवल्या जात आहेत तेथे मदत करतील, असेही अरविंद केजरीवाल म्हणाले. याच बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी भगवंतसिंह मान यांना त्यांच्या वक्तव्यावरून समज दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT