Operation Sindoor : "आमच्यावर वारंवार दहशतवादी हल्ले झाले. यावर मात करण्यासाठी शांततेच्या मार्गाने आम्ही सर्व आयुधे वापरली. आंतरराष्ट्रीय स्तरावर वारंवार पाकिस्तान आणि दहशतवाद यावर भाष्य केले. तक्रारी केल्या. मात्र काहीच उपगोय झाला नाही. पहलगामध्ये २२ एप्रिल रोजी निष्पाप पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला. आमच्या संयमाची पराकाष्ठा झाली. अखेर ७ मे रोजी आम्हाला दहशतवादाविरोधात कठोर कारवाई करणे भाग पडले. आम्ही ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor) राबवले. पाकिस्तानमध्ये असणारी दहशतवादी ९ तळ आणि त्याची मुख्यालयांवर अचूक लक्ष्यभेद केला. आम्हाला पाकिस्तानशी युद्धात रस नाही. मात्र यापुढे पाकिस्ताने भारतावर दहशतवादी हल्ला केल्यास आम्ही गप्प बसणार नाही, अशा शब्दांमध्ये काँग्रेस खासदार शशी थरूर ( Shashi Tharoor) यांनी अमेरिकेत भारताची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी दहशतवादाविरुद्धच्या युद्धात अमेरिकेच्या जनतेकडून सहकार्य करावे, असे आवाहनही केले.
पाकिस्तानकडून होणार्या दहशतवादी हल्ल्याविरोधात जागतिक स्तरावर भारताचा दृष्टिकोन मांडण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगभर दौरा करत आहे. शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सध्या अमेरिका दौर्यावर आहे. न्यू यॉर्कमधील भारतीय दूतावासात झालेल्या संवादादरम्यान थरूर म्हणाले, "तुम्हाला माहिती आहेच की, मी सरकारसाठी काम करत नाही. मी एका विरोधी पक्षासाठी काम करतो. मी स्वतः एक लेख लिहिला होता ज्यामध्ये म्हटले होते की, आता कठोर पण हुशारीने प्रहार करण्याची वेळ आली आहे. मला हे सांगायला आनंद होत आहे की भारताने नेमके तेच केले."
काँग्रेस खासदार थरूर म्हणाले की, "आम्हाला पाकिस्तानशी युद्धात रस नाही. देशाच्या आर्थिक विकास आणि नागरिकांना २१ व्या शतकातील जगात आणण्यासाठी आम्ही तटस्थ राहणे पसंत करू; पण दुर्दैवाने पाकिस्तान वारंवार दहशतवादाच्या मार्गाने भारतीय प्रदेशावर कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहे."
"पाकिस्तान दहशतवादाविरोधात कारवाईस अजूनही नकार देत आहे. आजवर भारतात हल्ले घडवून आणणार्या कोणत्याही दोषींना शिक्षा झालेली नाही. दहशतवाद्यांच्या पायाभूत सुविधा नष्ट करण्याचा कोणताही प्रामाणिक प्रयत्न झाला नाही. . दहशतवाद्यांची सुरक्षित आश्रयस्थानांची टिकून ठेवली जात आहे. दहशतवादी कुठे राहतात, त्यांचे सुरक्षित आश्रयस्थान कुठे आहे, त्यांना कुठे प्रशिक्षण दिले जाते, ते कसे तयार केले जातात, त्यांना निधी कुठून मिळतो, त्यांना कोण निर्देशित करते, त्यांना शस्त्रे कोण देते आणि अनेकदा या भयानक घटना घडवून आणण्यासाठी त्यांना थेट कोण सूचना देते याचा विचार आपण करायला हवा आणि ते जे काही करतात त्यासाठी त्यांना जबाबदार धरले पाहिजे, असेही त्यांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानवर जागतिक सुमदायाने कारवाई करावी, अशी मागणीही थरुर यांनी केली.
अमेरिकेने ९/११ दहशवादी हल्ल्याच्या यातना सहन केल्या आहेत. अमेरिकेप्रमाणेच भारतही दहशतवादाचा बळी आहे. भारतातही त्याच जखमांनी त्रस्त आहोत, ज्याच्या जखमा आज ९/११ हृदयस्पर्शी स्मारकात तुम्हाला दिसत आहेत.. आपण एकतेच्या भावनेने आलो आहोत, आपण एका मोहिमेवरही आलो आहोत. आम्हाला आशा आहे की आम्ही जगाला हे समजावून सांगू शकू की दहशतवादाच्या संकटाविरुद्ध सर्वांनी एकत्र उभे राहणे किती महत्त्वाचे आहे. ९/११ नंतर अमेरिकेने ज्याप्रमाणे आपला निर्धार दाखवला, त्याचप्रमाणे आपला देशही २२ एप्रिल रोजी आपल्यावर हल्ला करणाऱ्या वाईट शक्तींविरुद्ध उभा आहे."दहशतवादाविरुद्धच्या युद्धात अमेरिकेच्या जनतेकडून सहकार्य करावे, असे आवाहनही शशी थरुर यांनी केले.
शशी थरूर यांचे शिष्टमंडळ अमेरिका, पनामा, गयाना, ब्राझील आणि कोलंबियासह पाच देशांना भेट देणार आहे. शिष्टमंडळात भाजप खासदार तेजस्वी सूर्या, भुवनेश्वर कलिता आणि शशांक मणी त्रिपाठी, लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) च्या शांभवी चौधरी, टीडीपीचे जीएम हरीश बालयोगी, शिवसेनेचे मिलिंद देवरा, झारखंड मुक्ती मोर्चाचे सरफराज अहमद आणि अमेरिकेतील माजी भारतीय राजदूत तरणजीत सिंह संधू यांचाही समावेश आहे.