दिल्ली: पहलगाम हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. अनेक देशांना भारताला दहशवादविरोधी पाठींबा दर्शवला आहे. दरम्यान भारतातील विरोधी पक्षांनी देखील पीएम मोदी यांना दहशतवादविरोधी पाठिंबा दिला आहे. दरम्यान काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान मोदींना याबाबत पत्र लिहले आहे.
काँग्रेस अधयक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी पत्रामध्ये म्हटले आहे की, "सध्या आपल्यातील एकता आणि ऐक्य फार आवश्यक आहे. या महत्त्वाच्या वेळी, भारताने हे दाखवून दिले पाहिजे की आपण दहशतवादाविरुद्ध नेहमीच एक आहोत. या काळात विरोधकांना वाटते की, संसदेत दोन्ही सभागृहांचे विशेष अधिवेशन तातडीने बोलावणे महत्त्वाचे आहे. ही आपल्या सामूहिक निर्धाराची आणि इच्छाशक्तीची ठोस अभिव्यक्ती असेल. जी 22 एप्रिल 2025 रोजी पहलगाम येथे निरपराध नागरिकांवर झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्याचा सामना करण्यासाठी आवश्यक आहे. आम्हाला ही आशा आहे की, हे अधिवेशन लवकरात लवकर बोलावले जाईल".
जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर सर्वपक्षीय बैठक झाली. दरम्यान विरोधकांनी केंद्र सरकारला थेट आणि कठोर प्रश्न विचारले. बैठकीत विरोधकांचा मुख्य रोख हल्ला ज्या बैसरण या पर्यटकांसाठी प्रसिद्ध असलेल्या जागी झाला, त्या ठिकाणी सुरक्षादलांची उपस्थिती का नव्हती यावर होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित केला, आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंग यांच्यासह अनेकांनी त्याला पाठिंबा दिला.
विरोधकांच्या प्रश्नावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले की, बैसरण परिसर दरवर्षी जूनमध्ये सुरु होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी बंदोबस्ताखाली घेतला जातो. त्यावेळी अधिकृतपणे मार्ग खुले केले जातात आणि यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी सुरक्षा दल तैनात केले जातात. सरकारच्या म्हणण्यानुसार, स्थानिक टूर ऑपरेटरनी 20 एप्रिलपासूनच पर्यटकांना त्या भागात नेणे सुरू केले होते, जेव्हा यात्रा हंगामासाठी आवश्यक सुरक्षा यंत्रणा अद्याप सक्रिय झालेली नव्हती. स्थानिक प्रशासनालाही पर्यटकांची ही आगाऊ आवक माहिती नव्हती, त्यामुळे सुरक्षा तैनात करण्यात आली नव्हती.