नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा
काँग्रेसने हरियाणा निवडणूकीत १३ जागांवर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे शनिवारी केली. यापूर्वी हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने ७ जागांवर ईव्हीएम मध्ये बिघाड असल्याची तक्रार आयोगाकडे केली होती. यामुळे आता एकूण २० जागांवर काँग्रेसने ईव्हीएम ची तक्रार दाखल केली आहे. काँग्रेस नेते पवन खेडा म्हणाले की, पक्षाने २० जागांची यादी निवडणूक आयोगाकडे पाठवली आहे. निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ९९ टक्के बॅटरी चार्ज असलेल्या मशीन्सवर काँग्रेसला सर्वात मोठा पराभव स्वीकारावा लागला. ६० ते ७० टक्के बॅटरी चार्ज असलेल्या मशीनवर काँग्रेस विजयी झाली आहे. असे का घडले? तत्पूर्वी, काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी शुक्रवारी निवडणूक आयोगाला निवेदन सादर केले आणि आयोग या समस्येची दखल घेईल आणि योग्य निर्देश देईल, अशी आशा व्यक्त केली.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ९ ऑक्टोबर रोजी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी निवडणूक आयोगाला तक्रारींनी भरलेले निवेदन सादर केले होते. यानंतर, आज आम्ही हरियाणाच्या २० विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रक्रियेतील गंभीर आणि स्पष्ट अनियमितता अधोरेखित करणारे एक अद्ययावत निवेदन आयोगाला दिले आहे. आम्हाला आशा आहे की निवडणूक आयोग याची दखल घेईल आणि योग्य निर्देश देईल. त्या मशीन्स सील करून तपास पूर्ण होईपर्यंत सुरक्षित ठेवाव्यात, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली आहे.नारनौल, कर्नाल, डबवाली, रेवाडी, होडल, कालका, पानिपत सिटी, इंद्री, बदखल, फरीदाबाद एनआयटी, नलवा, रानिया, पतौडी, पलवल, बल्लभगड, बरवाला, उचाना कलान, घारौंडा, कोसली आणि बादशाहपूर या वीस विधानसभा मतदार संघातील ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याची तक्रार काँग्रेसने केली आहे.