भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद Pudhari File Photo
राष्ट्रीय

देशात आर्थिक अराजकता निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न : रविशंकर प्रसाद

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-

हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहाविरुद्ध केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराच्या ताज्या आरोपांवरून सत्ताधारी पक्ष विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देत आहे. यातच आता हिंडेनबर्ग अहवालावरून देशात आर्थिक अराजकता निर्माण करण्यात काँग्रेसचा प्रयत्न असल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी केला.

रविशंकर प्रसाद यांनी सोमवारी (दि.12) दिल्लीतील भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, “शेअर बाजार कोसळावा अशी काँग्रेसची इच्छा आहे. काँग्रेस आर्थिक अस्थिरता आणि अराजकता निर्माण करण्यात गुंतलेली आहे. मात्र जगात सुरक्षित, स्थिर आणि आश्वासक बाजारपेठ म्हणून भारताची ओळख आहे. लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर काँग्रेस आणि त्याच्या जवळच्या 'टूलकीट' मित्रपक्षांना आता भारतीय अर्थव्यवस्था अस्थिर करायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना विरोध करता करता काँग्रेसमध्ये आज भारताविरुद्ध द्वेष निर्माण झाला आहे. हिंडेनबर्गचा अहवाल शनिवारी प्रसिद्ध करण्यात आला. त्यांनंतर काँग्रेसने रविवारी हा मुद्दा आक्रमकपणे मांडला. जेणेकरून सोमवारी शेअर बाजाराला फटका बसेल,” असेही प्रसाद म्हणाले.

यापुर्वीच्या हिंडेनबर्गचा अहवालातून काहीही न मिळाल्यानंतर आता काँग्रेस पुन्हा जेपीसी चौकशीची मागणी करत आहे. भारताचा शेअर बाजार कोसळावा अशी काँग्रेसची इच्छा आहे. त्यांना छोट्या गुंतवणूकदारांनी भरभराट होऊ द्यायची नाही, असाही आरोप रविशंकर प्रसाद यांनी केला.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT