पुढारी ऑनलाईन डेस्क : पुढील २४ तासांत मान्सून केरळमध्ये पोहोचण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. तसेच पुढील २४ तासांत ईशान्येकडील राज्यांच्या काही भागांतही मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण असल्याची माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनची पहिली शाखा मंगळवारी (दि. २८) दक्षिण अरबी समुद्रात दाखल झाली होती. दुसरी शाखा बंगालच्या उपसागरातून पश्चिम बंगालसह पूर्वोत्तर राज्यांत आगामी ७२ तासांत येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
दरम्यान, पंजाब, हरियाणा-चंदीगढ-दिल्ली, राजस्थानचा अनेक भाग, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशचा पूर्व भाग तसेच बिहार, झारखंड, ओडिशामध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे.
दरम्यान, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (४०-५० किमी प्रतितास वेग) वाहण्याची शक्यता आहे. तसेच हलका ते माध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उत्तर कोकणातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक क्षेत्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने बुधवारी दिली.
दरम्यान, आज ब्रह्मपुरी, चंद्रपूर, वर्धा येथे ४५.२ अंश सेल्सियस कमाल तापमानाची नोंद झाली. तर सर्वात कमी किमान तापमान जेऊर येथे २२ अंश सेल्सियस होते.
हे ही वाचा :