CJP Jantar Mantar Lathi Charge Video Pudhari
राष्ट्रीय

CJP Parliament March: जंतर मंतरवर दगडांनी भरलेला ट्रक; आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडले, पोलिसांचा लाठीचार्ज, पाहा व्हिडिओ

CJP Parliament March: CJPच्या 'चलो संसद' मोर्च्यापूर्वी जंतर-मंतर परिसरात दगडांनी भरलेला ट्रक उभा असल्याचा दावा करण्यात आला असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

CJP Parliament March: कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) 'चलो संसद' मोर्च्यापूर्वी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. मोर्चा सुरू होण्यापूर्वी जंतर-मंतरजवळ दगडांनी भरलेला ट्रक उभा असल्याचा दावा CJPच्या कार्यकर्त्यांनी केला असून, त्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. याचदरम्यान, मोर्चा सुरू झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोपही CJPने केला असून, यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत.

CJPचे संस्थापक अभिजीत दीपके आणि इतर आयोजकांनी मोर्चा पूर्णपणे शांततापूर्ण असल्याचा दावा केला आहे. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना कोणत्याही प्रकारचा हिंसाचार किंवा कायदा हातात न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. "स्वतःही चुकीचे वागू नका आणि इतरांनाही तसे करू देऊ नका," असे आवाहन आयोजकांनी केले.

मात्र, जंतर-मंतर परिसरात दगडांनी भरलेला ट्रक दिसल्याच्या दाव्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. हा ट्रक नेमका कोणाचा होता, तो तेथे कशासाठी उभा होता आणि त्याचा आंदोलनाशी काही संबंध आहे का, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

जंतर-मंतर परिसरात कडेकोट सुरक्षा

'चलो संसद' मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी राजधानीत अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. जंतर-मंतर, संसद स्ट्रीट, सेंट्रल व्हिस्टा, कनॉट प्लेस आणि शंकर चौक परिसरात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था (Three-Tier Security Grid) उभारण्यात आली आहे.

या व्यवस्थेत दिल्ली पोलिसांचे दोन सुरक्षा स्तर आणि निमलष्करी दलाचा (Paramilitary Force) एक स्तर तैनात करण्यात आला आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तातडीने प्रतिसाद देण्यासाठी रॅपिड रिस्पॉन्स टीम्सही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

दिल्ली पोलिसांची भूमिका

नवी दिल्लीचे डीसीपी सचिन शर्मा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर नागरिकांसाठी सार्वजनिक सूचना जारी केली आहे. त्यांनी स्पष्ट केले की, 'चलो संसद' मोर्चासाठी कोणतीही अधिकृत परवानगी मागण्यात आलेली नाही आणि दिल्ली पोलिसांनी अशा कोणत्याही मोर्चाला परवानगी दिलेली नाही.' पोलिसांनी नागरिकांना कोणत्याही अनधिकृत मोर्चात सहभागी न होण्याचे आवाहन केले आहे.

BNSS कलम 163 लागू

संसदेचे पावसाळी अधिवेशन आणि आंदोलनाची शक्यता लक्षात घेऊन नवी दिल्ली परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 163 लागू करण्यात आले आहे. या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमणे, मोर्चा काढणे, निदर्शने करणे किंवा धरणे आंदोलन करण्यास बंदी आहे. फक्त जंतर-मंतर येथे, तीही पूर्वपरवानगी घेऊन, शांततापूर्ण आंदोलन करण्यास मुभा देण्यात आली आहे.

नियमांचे उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा

दिल्ली पोलिसांनी इशारा दिला आहे की, प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 223 तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हे दाखल करून कठोर कारवाई केली जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT