बिहार विधानसभेच्या निकालांचे सुरुवातीचे कल समोर येत असून एनडीएने जोरदार आघाडी घेतल्याचे चित्र आहे. 243 सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी लागणारा 122 चा आकडा एनडीए सहज गाठताना दिसत आहे. सध्या एनडीए 122 जागांवर आघाडीवर आहे, तर महागठबंधन 80 जागांवर आघाडीवर आहे.
भाजप लखीसराय, दरभंगा, पचना साहिब आणि पीरपैंती या मतदारसंघांत पुढे आहे. काँग्रेस बहादुरगंज, किशनगंज, कदवा आणि हिसुआ येथे आघाडी घेताना दिसत आहे. जेडीयू सुपौल, सरायरंजन, मोरवा, मोकामा, राजगीर आणि झाझा येथे मजबूत स्थितीत आहे. नव्याने उदयास आलेला जनसुराज पक्ष 4 जागांवर आघाडीवर असून एआयएमआयएम 2 जागांवर, तर बसपा आणि आप प्रत्येकी एका जागेवर घेताना दिसत आहे.
हमचे नेतृत्व करणारे अनिल कुमार यांनी दावा केला आहे की, “मुख्यमंत्री म्हणून नितीशकुमारच परत येणार असून आमच्या खात्यात सहा जागा जाणार आहेत.” काँग्रेसचे राजेश राम (कुटुंबा) आणि शिवानी शुक्ला (लालगंज) आघाडीवर आहेत. मात्र उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते सम्राट चौधरी तारापुर मतदारसंघात मागे पडले असून RJD चे अरुण कुमार येथे पुढे आहेत.
दरम्यान मनेर मतदारसंघात RJD चे भाई वीरेंद्र आघाडी घेत आहेत. कटिहार जिल्ह्यातील सातही मतदारसंघांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. कटिहारहून VIP चे सौरव अग्रवाल, मनिहारीहून जेडीयूचे सौरभ सुमन आणि बरारीहून जेडीयूचे विजय सिंह निषाद आघाडीवर आहेत. कदवा व कोढा येथे काँग्रेसचे उमेदवार पुढे आहेत, तर प्राणपुर येथे भाजपच्या निशा सिंहांनी आघाडी घेतली आहे. बलरामपुरातून मालेचे सीपीआय-एमएल उमेदवार पुढे आहेत.
हा कल पोस्टल बॅलेटच्या प्रारंभिक मोजणीतून समोर आला असून अंतिम निकालांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. यावेळी बिहारमध्ये दोन टप्प्यांत मतदान झाले. पहिल्या टप्प्यात 65.08% आणि दुसऱ्या टप्प्यात 68.76% मतदान झाले. एकूण मतदान 66.91% इतके असून राज्यभरात निवडणूक उत्साह स्पष्ट जाणवत होता.
243 पैकी कोणत्या पक्षाकडे सत्ता जाते, याची अंतिम घोषणा आज होणार आहे. बिहार निवडणुकीतील प्रत्येक क्षणाची अपडेट्स ईसीआयच्या अधिकृत वेबसाइटवर आणि पुढारी न्यूज प्लॅटफॉर्मवर पाहता येणार आहेत.