राष्ट्रीय

Bihar Election Result : 'गेम चेंजर' विनोद तावडे होणार भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष? बिहारच्या विजयाचे मिळणार बक्षिस

बिहारमधील शपथविधीनंतर विनोद तावडे हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनतील असा अंदाज

रणजित गायकवाड

bihar election result vinod tawde may be new bjp national president

नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) झंझावात विरोधकांना रोखता आलेला नाही. निकालांचे कल स्पष्टपणे दर्शवत आहेत की, एनडीएने बहुमताचा 'जादुई आकडा' सहजपणे ओलांडून विजय पताका फडकावली आहे. दुसरीकडे, महागठबंधन मात्र बहुमतापासून खूप दूर फेकले गेले आहे. विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, काँग्रेससारखा राष्ट्रीय स्तरावरील मोठ्या पक्षाला केवळ पाच जागांवर आघाडी मिळाली आहे.

एनडीएच्या या दणदणीत यशामागे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या कल्याणकारी योजनांचा आधार तर आहेच, पण त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, भारतीय जनता पक्षाने (भाजप) आखलेली 'धडाकेबाज आणि अभेद्य रणनीती' निर्णायक ठरल्याचे तज्ञांचे मत आहे

बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने महाआघाडीविरुद्ध अत्यंत आक्रमक पवित्रा घेत प्रचार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'जंगलराज'च्या मुद्द्यावरून विरोधकांना घेरले. ज्यामुळे मतदारांना पुन्हा एकदा लालू प्रसाद यादव यांच्या 'जंगलराज'ची आठवण झाली. मोदी-नितीश या जोडगोळीला जनतेने भरभरून पसंती दर्शवली. याचा परिणाम म्हणून एनडीएला जबरदस्त जनसमर्थन मिळाले. एनडीएच्या या विजयानंतर भाजपचे रणनीतिकार धर्मेंद्र प्रधान आणि विनोद तावडे यांचे नाव ठळकपणे समोर आले आहे.

धर्मेंद्र प्रधान यांच्या नावाची चर्चा

धर्मेंद्र प्रधान यांची सप्टेंबर महिन्यात बिहारमध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, मात्र त्यांचे बिहारशी जुने नाते आहे. २०१२ साली ते बिहारमधून राज्यसभा सदस्य म्हणून निवडले गेले होते. तेव्हापासूनच त्यांनी बिहारमध्ये संघटनेची पकड मजबूत करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान त्यांचे नितीश कुमार यांच्याशी अत्यंत चांगले व्यक्तिगत संबंध निर्माण झाले.

ओबीसी समाजाचे 'धर्मेंद्र प्रधान'

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजकीय यशाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते ओबीसी (OBC) समुदायातून येतात. हाच तो समाज आहे, जो आतापर्यंत मुख्यमंत्री नितीश कुमार यांची 'अभेद्य मतपेढी' मानला जात होता.

प्रधान यांनी बिहारमधील जनतेच्या मनातील भावना आणि राजकीय कल अचूकपणे ओळखला. केवळ ओळखलाच नाही, तर त्यांनी अनेक महत्त्वाच्या जागांवर कौशल्यपूर्ण बदल करत उमेदवारांची निवड केली. त्यांच्या या सर्व खेळीमुळे, बिहारच्या रणभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांनी भाजपचे 'आधुनिक चाणक्य' म्हणून स्वतःची ओळख सिद्ध केली आहे.

विनोद तावडे यांना 'अध्यक्षपदा'चे बक्षीस?

दुसरीकडे, बिहारमध्ये भाजपचे निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सांभाळणारे विनोद तावडे यांचीही बरीच चर्चा होत आहे. राजकीय तज्ज्ञांच्या मते, बिहारमध्ये एनडीएला इतकी मोठी आघाडी मिळवून देण्यात विनोद तावडे यांच्या बुद्धीचा कस लागला आहे. तावडे यांनी प्रत्येक जागेवरील उमेदवारांची निवड अत्यंत विचारपूर्वक केली. गायिका मैथिली ठाकूर यांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची चाल याच रणनीतिकाराची होती.

आता या नव्या-दमाच्या रणनीतिकाराला भाजप कोणते मोठे बक्षीस देते, याकडे लक्ष लागले आहे. बिहारमधील शपथविधीनंतर विनोद तावडे हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बनतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT