प्रातिनिधिक छायाचित्र 
राष्ट्रीय

Bihar Election : बिहारमध्‍ये महाआघाडीत 'महाभारत'! १२ जागांवर मित्रपक्षांमध्‍येच जुंपली; कोणाला होणार फायदा?

अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस २० ऑक्टोबर रोजी संपत असूनही, महाआघाडीने औपचारिकपणे जागावाटप व्यवस्थेची घोषणा केलेली नाही.

पुढारी वृत्तसेवा

ठळक मुद्‍दे

  • ऐन दिवाळीत बिहारमध्‍ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला

  • राष्‍ट्रीय जनता दलाकडून 143 उमेदवारांची यादी जाहीर

  • तेज प्रताप यादव यांच्याविरोधात राजदकडून मुकेश रौशन यांना उमेदवारी

Bihar Assembly Election 2025

पाटणा : ऐन दिवाळीत बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहचली आहे. एकीकडे सत्ताधारी भाजप आणि जनता दल संयुक्‍त पक्षात समान जागा वापट झाले. तर दुसरीकडे विरोधकांच्‍या महाआघाडीत काही जागांवरील मतभेद चव्‍हाट्यावर आले आहेत. आता अंतर्गत संघर्षात १२ जागांवर महाआघाडीतील मित्र पक्षांमध्‍येच प्रमुख लढत होईल, असे चित्र आहे.

महाआघाडीतील मित्र पक्ष आमने-सामने

राष्‍ट्रीय जनता दलाने सोमवारी(२० ऑक्‍टोबर) 143 उमेदवारांची यादी जाहीर केली. यामध्‍येश काँग्रेसने उमेदवारी दिलेल्‍या वैशाली, सिकंदरा, कहलगाव, सुलतानगंज, नरकटियागंज आणि वारसालीगंज मतदारसंघाचा समावेश होता.त्‍यामुळे विधानसभा निवडणुकीतील सहा जागांवर राष्‍ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांच्‍यातच लढत होणार असल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. तसेच महाआघाडीतील भारतीय कम्‍युनिस्‍ट पार्टी आणि काँग्रेस हे चार मतदारसंघांमध्‍ये एकमेकांविरोधात लढत आहे. मुकेश सहानी यांचा विकासशील इंसान पार्टी (व्हीआयपी) आणि राजद दोन जागांवर (चैनपूर आणि बाबूबाढी) एकमेकांविरोधात लढणार असल्‍याचे चित्र स्पष्ट झाले आहे. दरम्‍यान, दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २३ ऑक्टोबरपर्यंत अनिश्चिततेचे ढग दूर होण्याची शक्यता आहे. तथापि, पहिल्या टप्प्यात मतदान होणार असलेल्या बच्छवारा, राजापाकर, बिहार शरीफ येथे - उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आधीच संपली असल्याने येथे थेट संघर्ष होणार आहे.

महाआघाडीतील मतभेदाचा कोणाला होणार फायदा?

बिहारमधील राजकीय विश्‍लेषकांच्‍या मते, महाआघाडीतील अंतर्गत संघर्षांमुळे विरोधी मतांमध्ये फूट पडू शकते. याचा थेट फायदा भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला अनेक मतदारसंघांमध्ये होण्याची शक्यता आहे. असेच मत लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) प्रमुख चिराग पासवान यांनी सोमवारी व्‍यक्‍त केले होते. पासवान म्‍हणाले होते की, "मी कधीही अशी निवडणूक पाहिली नाही जिथे एवढी मोठी युती फुटण्याच्या उंबरठ्यावर आहे. जागांच्या निवडीवरून वाद होऊ शकतो; परंतु त्यांना जागांची संख्याही ठरवता आलेली नाही," असे पासवान म्हणाले. मैत्रीपूर्ण लढाई असे काहीही नसते. तुम्ही एकतर मित्र आहात किंवा तुम्ही एकमेकांविरुद्ध लढत आहात. जर तुम्ही एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत असाल आणि नेत्यांना लक्ष्य करत असाल, तर इतर जागांवर याचा परिणाम होणार नाही अशी अपेक्षा तुम्ही कशी करू शकता?" असा सवालही त्‍यांनी माध्‍यमांशी बोलताना केला होता.जनशक्ती पार्टी (रामविलास) पक्ष राज्‍यात २९ जागांवर निवडणूक लढवत आहे.

महाआघाडीमधील दुफळी स्‍पष्‍ट : जेडीयू नेते राजीव रंजन प्रसाद

महाआघाडीच्या जागावाटपावरुन सुरु असलेल्‍या संघर्षावर बोलताना जनता दल संयुक्‍त (जेडीयू)चे नेते राजीव रंजन प्रसाद म्‍हणाले की, बिहारमध्ये महाआघाडी अस्तित्वाच्या संकटातून जात आहे. उमेदवार एकमेकांविरुद्ध अर्ज दाखल करत असल्याने अंतर्गत दुफळी स्पष्टपणे दिसून येत आहे. झामुमोमध्ये थोडाही स्वाभिमान शिल्लक असेल तर त्यांनी झारखंडमध्येही आरजेडीला बाहेर पडण्याचे दरवाजे दाखवावेत."

तेज प्रताप यादव यांच्याविरोधात राजदकडून मुकेश रौशन यांना उमेदवारी

दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस २० ऑक्टोबर रोजी संपत असूनही, महाआघाडीने औपचारिकपणे जागावाटप व्यवस्थेची घोषणा केलेली नाही. राज्‍यात सर्वात लक्षवेधी लढत ही लालूप्रसाद यादव विरुद्‍ध त्‍यांचे पुत्रे तेज प्रताप यादव अशी असणार आहे. महुआ मतदारसंघात लालू प्रसाद यांनी घरातून हकालपट्‍टी केलेले पुत्र तेज प्रताप यादव यांच्या विरोधात राजदने मुकेश रौशन यांना उमेदवारी दिली आहे. तेज प्रताप यांना या वर्षाच्या सुरुवातीला पक्षातून काढून टाकण्यात आले होते. त्यांनी जनशक्ती जनता दल नावाचा पक्ष स्थापन केला आहे. आता बिहारमधील यादव कुटुंबातील कलह या यंदाच्‍या निवडणुकीतील चर्चेचा विषय ठरला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT