नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
सायबर गुन्हेगारी विरोधातील केंद्र सरकारच्या मोहिमेत सुप्रसिद्ध अभिनेता अमिताभ बच्चन यांनी सहभाग घेतला आहे. याबद्दल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘एक्स’वर पोस्ट करुन अमिताभ बच्चन यांचे आभार मानले. केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह म्हणाले की, गृह मंत्रालयाने देशात सुरक्षित सायबर स्पेस निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (आयसी ४) ने या दिशेने अनेक पावले उचलली आहेत.
अमिताभ बच्चन यांनी या संदर्भात एक व्हिडीओ संदेश जारी केला आहे. त्यामध्ये बच्चन यांनी म्हटले आहे की, देशातील आणि जगातील वाढती सायबर गुन्हेगारी ही चिंतेची बाब आहे. गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले भारतीय सायबर गुन्हे समन्वय केंद्र सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विनंतीवरून आपण या मोहिमेत सामील झालो असल्याचे बच्चन यांनी सांगितले. देशाला या समस्येतून मुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे, असे ते म्हणाले. आपली थोडी सतर्कता आणि सावधगिरी आपल्याला सायबर गुन्हेगारांपासून वाचवू शकते, असे ते म्हणाले.