ATF Price Hike India: जागतिक ऊर्जा बाजारात मोठी उलथापालथ सुरू असताना भारत सरकारने विमान प्रवास महाग होऊ नये म्हणून महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एअर टर्बाइन फ्युएल (ATF) च्या किमतीत मोठी वाढ अपेक्षित असताना सरकारने त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
मध्यपूर्वेतील तणाव आणि विशेषतः हॉर्मुझची सामुद्रधुनी या महत्त्वाच्या समुद्री मार्गाच्या बंदीमुळे जागतिक ऊर्जा बाजारात अस्थिरता निर्माण झाली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर इंधनाच्या किमतीत मोठी वाढ झाली असून भारतात ATF दर 1 एप्रिलपासून 100% पेक्षा जास्त वाढतील, अशी शक्यता होती.
मात्र पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि नागरी उड्डाण मंत्रालयाच्या चर्चेनंतर PSU ऑइल कंपन्यांनी मोठा दिलासा दिला आहे. ATF दरात एकदम मोठी वाढ न करता फक्त 25% म्हणजेच सुमारे ₹15 प्रति लिटर इतकी मर्यादित वाढ लागू करण्यात आली आहे. हा निर्णय विशेषतः देशांतर्गत विमान प्रवास स्वस्त ठेवण्यासाठी घेतल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
या निर्णयामुळे देशांतर्गत विमान कंपन्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. मात्र आंतरराष्ट्रीय मार्गांवर चालणाऱ्या फ्लाइट्सना ATF च्या पूर्ण वाढीव किमती द्याव्या लागणार आहेत.
जर ATF दरात 100% वाढ झाली असती, तर विमान तिकिटांचे दरही मोठ्या प्रमाणात वाढले असते. पण सरकारच्या या हस्तक्षेपामुळे तिकिटांच्या किमतीत अचानक होणारी मोठी वाढ टाळली गेली आहे. जागतिक तणाव आणि ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने संतुलित भूमिका घेतली आहे.
एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजाराशी समन्वय ठेवत, तर दुसरीकडे देशांतर्गत प्रवाशांवर आर्थिक भार पडू नये यासाठी टप्प्याटप्प्याने दरवाढ लागू करण्यात आली आहे. यामुळे सध्या तरी विमान प्रवास सर्वसामान्यांसाठी परवडणार आहे, असं सरकारने सांगितलं आहे.