Assembly Election Results 2026
चेन्नई/कोलकाता/तिरुवनंतपुरम : संपूर्ण देशाचे लक्ष वेधलेल्या पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र स्पष्ट होत आहे. प. बंगाल, तामिळनाडू आणि केरळ या तिन्ही राज्यांमध्ये ऐतिहासिक सत्तांतराची वाटचाल सुरू असल्याचे चित्र आहे. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची पिछाडीवर असून भारतीय जनता पक्षाने बहुमताकडे कूच केली आहे. तर तामिळनाडूत अभिनेता विजयच्या 'टीव्हीके' पक्षाने पहिल्याच प्रयत्नात लक्षवेधी कामगिरी करत सत्ताधारी द्रमुकला तिसऱ्या क्रमांकावर ढकलले आहे. दुसरीकडे, डाव्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या केरळ राज्यातील जनतेचा मानस काँग्रेसच्या हाती सत्तेची चावी देण्याचा दिसत आहे. आसाममध्ये भाजप आपली सत्ता अबाधित ठेवत असल्याचे दिसत आहे, तर पुद्दुचेरीत सत्ताधारी एनआर काँग्रेसची सत्तेकडे वाटचाल सुरू आहे.
निवडणुकीच्या कलांनुसार, जरी 'थलपती' विजय यांचा पक्ष (TVK) सध्या सर्वाधिक जागांवर आघाडीवर असला, तरी राजकारणाच्या क्षेत्रात जोपर्यंत 'जादुई आकडा'—म्हणजेच स्पष्ट बहुमत—गाठला जात नाही, तोपर्यंत कोणतीही गोष्ट निश्चित मानली जात नाही. विशेषतः, तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी एखाद्या पक्षाला ११८ जागांची आवश्यकता आहे. सध्या, विजय यांचा पक्ष १०० ते ११० जागांच्या दरम्यान आघाडीवर आहे. परिणामी, राजकीय वर्तुळात एक प्रश्न वेगाने चर्चेत येत आहे: जर विजय यांना स्वबळावर सरकार स्थापन करण्यात अपयश आले आणि परिस्थिती 'त्रिशंकू विधानसभे'ची (hung assembly) निर्माण झाली, तर ते कोणत्या पक्षाचा पाठिंबा घेतील किंवा कोणत्या पक्षाशी युती करण्याचा पर्याय निवडतील?
कोलकात्यातील भाजपच्या प्रदेश कार्यालयाबाहेर उत्सवाचे वातावरण आहे; कारण राज्यात बहुमताचा आकडा पार करण्याच्या उंबरठ्यावर हा पक्ष असल्याचे दिसून येत आहे. निवडणूक आयोगाकडील कलानुसार, भाजप १७३ जागांवर आघाडीवर आहे. 'विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण' (SIR) प्रक्रियेअंतर्गत विक्रमी संख्येने मतदारांची नावे वगळल्यानंतर झालेली ही पहिलीच निवडणूक आहे. यात १५ वर्षे सत्तेवर राहिल्यानंतर आता तृणमूल काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
केरळमध्ये एकूण १४० जागांपैकी काँग्रेस प्रणित UDF ने ९६ जागांवर आघाडी घेतली आहे. सत्ताधारी LDF ४१ जागांवर आघाडीवर आहे. येथे बहुमतासाठी ७१ जागांची आवश्यकता असून केरळमध्ये डाव्यांची वाटचाल पराभवाकडे असल्याचे दिसत आहे.
आसाम विधानसभा निवडणुकीतील सुरुवातीच्या कलानुसार, सत्ताधारी भाजपच्या नेतृत्वाखालील 'राष्ट्रीय लोकशाही आघाडी'ने (NDA) बहुमताचा आकडा पार केला आहे. एकूण १२६ जागांपैकी, भाजप ९७ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस २४ जागा मिळवण्याच्या स्थितीत असल्याचे दिसून येत आहेयेथे बहमुतासाठी ६४ जागांची गरज असून, भाजप राज्यात पुन्हा सत्तेवर परतण्याचे एक प्रबळ संकेत मानले जात आहेत.
पुदुच्चेरीमध्ये एकूण ३० जागांपैकी, भाजप आघाडी २२ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस आघाडी ६ जागांवर विजय मिळवत आहे. येथेही भाजप सत्ता अबाधित ठेवणार असे चित्र आहे.