गुवाहाटी: आसाममध्ये लागोपाठ तिसऱ्यांदा एकदा कमळ फुलणार हे स्पष्ट झाले असून, सुरुवातीपासून भाजपने जबरदस्त मुसंडी मारली आहे. आतापर्यंत भाजपने 102 जागांवर आघाडी घेत सत्तास्थापनेच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. काँग्रेसला पहिल्या कलामध्ये 19 जागांवर समाधान मानावे लागले आहे. धक्कादायक बाब म्हणजे काँग्रेसचा प्रमुख चेहरा असलेले गौरव गोगोई यांना पराभवाचा कडवट डोस गिळावा लागला.
आसामात अन्य 2 जागांवर अपक्ष आघाडीवर आहेत. भाजप आसामचा किंगमेकर ठरणार असल्याचे चित्र स्पष्ट आहे. विशेष म्हणजे भाजपने गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी 30 पेक्षा अधिक जागा मिळत आसाममध्ये पक्षाची ताकद वाढवली आहे.
उपलब्ध माहितीनुसार, भाजपने तीन-चतुर्थांशचा टप्पा ओलांडला असून, 102 जागांसह आपली मजबूत आघाडी कायम ठेवली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा जलुकबारी मतदारसंघात आघाडीवर आहेत.
जोरहाट मतदारसंघात भाजपचे उमेदवार हितेंद्र नाथ गोस्वामी आघाडीवर आहेत. काँग्रेसने या मतदारसंघातून गौरव गोगोई यांना उमेदवारी दिली आहे. दलगावमध्ये एआययूडीएफचे मुजीबूर रहमान आघाडीवर आहेत आणि बिन्नाकंडीमध्ये मोहम्मद बद्रुद्दीन अजमल आघाडीवर आहेत.
नौबोइचा मतदारसंघातील एजीपीचे उमेदवार बसंत दास यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे. त्यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाने मतमोजणीसाठी उत्कृष्ट व्यवस्था केली आहे. दास यांच्या मते, त्यांचा विजय 100 टक्के निश्चित आहे आणि पक्ष नेहमीप्रमाणे यावेळीही यशस्वी होईल.
राज्यात पुन्हा हिमंत बिस्वा सरमा यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल आणि एनडीए सत्तेत परत येईल, असेही ते म्हणाले. आसाममधील 126 विधानसभा जागांसाठी एकूण 722 उमेदवारांचे राजकीय भवितव्य निश्चित झाले आहे.
आसाममध्ये भाजपने शतकासह हॅट्ट्रिक नोंदवली. याचे संपूर्ण श्रेय आसाममधील जनतेला द्यावे लागेल. आम जनतेने पंतप्रधान मोदी यांच्या समर्थ नेतृत्वावर विश्वास दाखवला. यापुढे आसामचा सर्वतोपरी विकास घडवण्यास भाजप कटिबद्ध आहे.- हिमंता बिस्वा सरमा, आसामचे मुख्यमंत्री