पुढारी ऑनलाईन डेस्क : मला सत्तेचा मोह नाही. मी आयुष्यात फक्त प्रामाणिकपणा कमवला. मी भ्रष्टाचारी असेल तर मला मत देऊ नका, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला भ्रष्ट असल्याचे सिद्ध करण्याचा कट रचला आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे (आप) नेते आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी केला आहे.
आज दिल्लीतील जंतर-मंतर येथे 'जनता दरबार' कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले की, मी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीचा भुकेला नसल्याने मी राजीनामा दिला. मी पैसे कमवण्यासाठी नाही, तर देशाचे राजकारण बदलण्यासाठी आलो असल्याचे ते म्हणाले. १० वर्ष प्रामाणिकपणे सरकार चालवलं, पण जेव्हा भाजपने भ्रष्ट म्हटले तेव्हा दु:ख झाले, असेही केजरीवाल म्हणाले.
अरविंद केजरीवाल यांनी मोहन भागवत यांना पाच प्रश्न केले आहेत. ते म्हणाले की, "आरएसएसचे लोक म्हणतात की आम्ही राष्ट्रवादी आणि देशभक्त आहोत. मी मोहन भागवत यांना पाच प्रश्न विचारू इच्छितो, पंतप्रधान मोदी ज्या प्रकारे पक्ष फोडत आहेत आणि आमिष दाखवून देशभरातील सरकार पाडत आहेत हे योग्य आहे का? ईडी आणि सीबीआयमार्फत धमकावणे योग्य आहे का? भाजपची दिशाभूल होऊ नये याची जबाबदारी आरएसएसची आहे, तुम्ही कधी मोदींना चुकीच्या गोष्टी करण्यापासून रोखले आहे का? मुलगा आपली नाराजी दाखवत आहे, हे सांगताना तुम्हाला वाईट वाटले नाही का? जे अडवाणींना लागू होते, ते मोदींना का लागू होणार नाही?