जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये सोमवारी लष्कराच्या वाहनावर झालेला हल्ल्यामागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचा सहभाग होता. हल्ल्यात त्यांनी अत्याधुनिक शस्त्रांचा वापर केला, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने 'इंडिया टूडे'ने दिली आहे. हल्ल्यापूर्वी रेकी करण्यासाठी दहशतवाद्यांनी स्थानिक समर्थकांच्या मदत घेतली असावी, असाही प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
कठुआ शहरापासून सुमारे 150 किमी अंतरावर लोहाई मल्हारमधील बदनोटा गावाजवळ माचेडी-किंडली-मल्हार रस्त्यावर दुपारी 3.30 च्या सुमारास दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकला लक्ष्य केले. या भ्याड हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. यामध्ये एका ज्युनियर कमिशन्ड ऑफिसरचा (जेसीओ) समावेश आहे. जखमी पाच जवानांवर उपचार सुरु आहेत.
दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी वापरलेल्या अत्याधुनिक शस्त्रांमध्ये एम 4 कार्बाइन रायफल आणि स्फोटक उपकरणांचा समावेश आहे. बडनोटा गावात जिथे हा हल्ला झाला तेथील रस्ता खराब आहे. वाहने ताशी 10-15 किलोमीटर वेगानेच जातात. लष्कराची वाहने अतिशय संथ गतीने जात असल्याचा दहशतवाद्यांनी फायदा घेतला. दोन ते तीन दहशतवाद्यांनी एक ते दोघा स्थानिकांच्या मदतीने टेकडीवरुन लष्कराच्या वाहनांवर ग्रेनेड फेकले. यानंतर नंतर त्यांच्यावर अंदाधूंद गोळीबार केला. मागील दहशतवादी हल्ल्यांप्रमाणेच सर्वप्रथम वाहनावरील चालकालाच लक्ष्य करण्यात आले. प्राथमिक तपासात असेही आढळून आले आहे की हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी या भागात रेकी केली होती.
हल्ल्यानंतर पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांच्या मदतीने जोरदार प्रत्युत्तर दिले. दहशतवादी जवळच्या जंगलात पळून गेले. त्यांना स्थानिक समर्थकांचा पाठिंबा मिळाला असावा असा प्राथमिक अंदाजही व्यक्त केला जात आहे.
११ आणि १२ जून रोजी जम्मू आणि काश्मीरमधील डोडा जिल्हा दुहेरी दहशतवादी हल्ल्यांनी हादरला होता. ११ जून रोजी चत्तरगल्ला येथील संयुक्त चेक पोस्टवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सहा सुरक्षा कर्मचारी जखमी झाले होते, तर कोटा टॉप येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक पोलिस अधिकारी जखमी झाला होता. १२ जून रोजी गांडोह परिसरात दहशतवादी हल्ला झाला होता. जम्मू भागात महिनाभरातील पाचवा हा दहशतवादी हल्ला झाला असून, त्याचा सर्वत्र निषेध करण्यात आला आहे. तीन माजी मुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांनी जम्मू आणि काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी घटनांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.