नवी दिल्ली : देशातील सर्व नक्षलवादी आत्मसमर्पण करत नाहीत, पकडले जात नाहीत किंवा संपवले जात नाहीत तोपर्यंत केंद्र सरकार शांत बसणार नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी केले. छत्तीसगडमधील करेगुट्टालू टेकडीवर 'ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट' यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या सीआरपीएफ, छत्तीसगड पोलिस, डीआरजी आणि कोब्रा जवानांचा केंद्रीय गृहमंत्र्यांनी सन्मान केला. यावेळी ते बोलत होते.
सर्वात मोठ्या नक्षलविरोधी 'ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट' मध्ये, शूर जवानांनी शौर्य दाखवले आणि कारवाई यशस्वी केल्याबद्दल जवानांचे अमित शाह यांनी अभिनंदन केले. 'ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट' दरम्यान जवानांचे शौर्य नक्षलविरोधी ऑपरेशनच्या इतिहासातील एक सुवर्ण अध्याय म्हणून लक्षात ठेवले जाईल, असे ते म्हणाले. सर्व नक्षलवादी आत्मसमर्पण करत नाहीत, पकडले जात नाहीत किंवा त्यांचा खात्मा केला जात नाही तोपर्यंत सरकार स्वस्थ बसणार नाही, भारत नक्षलमुक्त करू, असे ते म्हणाले.
नक्षलविरोधी ऑपरेशनमध्ये गंभीर शारीरिक दुखापत झालेल्या सुरक्षा दलातील जवानांचे जीवन सुरळीत करण्यासाठी मोदी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. नक्षलविरोधी ऑपरेशन्समुळे, परिसरातील ६.५ कोटी लोकांच्या जीवनात नवी पहाट दिसली आहे. ३१ मार्च २०२६ पर्यंत देश नक्षलवादमुक्त करण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध आहे, असे गृहमंत्री म्हणाले.