Amarnath Yatra Baba Barfani: देशातील सर्वात पवित्र आणि कठीण धार्मिक यात्रांपैकी एक असलेल्या अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. ३ जुलैपासून पहलगाम मार्गे सुरू होणारी ही यात्रा ५७ दिवस चालणार असून २८ ऑगस्टला तिची सांगता होणार आहे. दरवर्षी लाखो शिवभक्त हिमालयातील उंच डोंगर, कठीण प्रवास आणि प्रतिकूल हवामानाचा सामना करत बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी अमरनाथ गुहेपर्यंत पोहोचतात.
अमरनाथ गुहेत नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या बर्फाच्या शिवलिंगाला भाविक प्रेमाने 'बाबा बर्फानी' असे संबोधतात. हिंदू धर्मातील श्रद्धेनुसार हे भगवान शंकरांचे स्वयंभू स्वरूप मानले जाते. विशेष म्हणजे हे हिमलिंग दरवर्षी नैसर्गिकरित्या तयार होते आणि चंद्राच्या कलांप्रमाणे त्याचा आकार कमी-जास्त होत असल्याचे मानले जाते.
बाबा बर्फानींचे दर्शन पूर्णपणे निसर्गावर अवलंबून असते. गुहेतील तापमान कमी असेपर्यंत बर्फाचे शिवलिंग कायम राहते. मात्र उन्हाची तीव्रता वाढली किंवा तापमान वाढले की हे हिमलिंग हळूहळू वितळू लागते.
यामुळे यात्रेच्या सुरुवातीला अनेक भाविकांना हिमलिंगाचे दर्शन होते, पण नंतर काही वेळा ते पूर्णपणे वितळते. त्यामुळे अनेकांच्या मते, ज्यांच्यावर भगवान शंकरांची कृपा असते, त्यांनाच बाबा बर्फानींचे प्रत्यक्ष दर्शन घडते, अशी श्रद्धा आहे.
हिमलिंग वितळल्यानंतरही अमरनाथ यात्रा थांबत नाही. गुहेतील पवित्र स्थळी नियमित पूजा-अर्चा सुरूच राहते. भाविक त्या स्थानाचे दर्शन घेऊन पूजा करतात आणि शिवाचा आशीर्वाद घेतात.
पौराणिक कथेनुसार, भगवान शंकरांनी याच अमरनाथ गुहेत माता पार्वतींना अमरत्वाचे रहस्य सांगितले होते. ही कथा कोणालाही ऐकू येऊ नये म्हणून त्यांनी नंदी, चंद्र, सर्प, गणेश आणि पंचमहाभूतांचा त्याग करून एकांत स्थळ म्हणून अमरनाथ गुहेची निवड केली होती. याच कारणामुळे अमरनाथ गुहेला विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त झाले असून, दरवर्षी लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने या पवित्र यात्रेत सहभागी होतात.
नोंद: बाबा बर्फानी, अमरनाथ गुहा आणि अमरत्वाच्या कथेशी संबंधित माहिती ही हिंदू धर्मातील पारंपरिक श्रद्धा आणि पौराणिक मान्यतांवर आधारित आहे.