amarnath yatra 2026 baba barfani shivling melting reasons climate change darshan days
पुढारी ऑनलाईन : अमरनाथ यात्रा २०२६ : यंदाच्या अमरनाथ यात्रेत बाबा बर्फानींचे नैसर्गिक शिवलिंग अवघे ५ दिवसच दर्शनासाठी उपलब्ध राहिले. दरवर्षी दर्शनाचे दिवस कमी होत असून शिवलिंग लवकर वितळत असल्याने भाविकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. यामागे हवामान बदल, वाढती गर्दी, विकासकामे की आणखी काही कारणे आहेत? जाणून घेऊया.
५७ दिवसांवरून अवघे ५ दिवस
पूर्वी बाबा बर्फानींचे दर्शन तब्बल ५७ दिवस होत असे. त्यानंतर हा कालावधी ३८ दिवस, २८ दिवस, ७ दिवस आणि आता फक्त ५ दिवसांवर आला आहे. हा केवळ आकडा नाही, तर दरवर्षी कमी होत चाललेल्या दर्शनाच्या कालावधीमुळे भाविकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. पुढच्या काळात हा आकडा शून्यावर तर जाणार नाही ना, अशी चिंता अनेकांना सतावत आहे.
गुहेत शिवलिंगच दिसले नाही
७ जुलै २०२६ रोजी हजारो भाविक "बम भोले"च्या जयघोषात अमरनाथ गुहेत पोहोचले. मात्र, आतले दृश्य पाहून सर्वजण स्तब्ध झाले. ज्या ठिकाणी बाबा बर्फानींचे शिवलिंग असते, तेथे फक्त ओला दगड दिसत होता. ना चोरी, ना तोडफोड; पण नैसर्गिक शिवलिंग पूर्णपणे वितळले होते. दरम्यान, सुमारे ३ लाख भाविक यात्रेच्या मार्गावर होते. अनेकांनी महिन्यांपूर्वी नोंदणी केली होती, तर काहींनी वर्षानुवर्षे बचत करून ही यात्रा आखली होती. मात्र, त्यांच्या वाट्याला यावेळी रिकामी गुहा आली.
बाबा बर्फानी कसे तयार होतात?
अमरनाथ गुहेतील शिवलिंग हे कोणत्याही व्यक्तीने किंवा यंत्राने तयार केलेले नसते. हिवाळ्यात गुहेच्या छतावरून पाण्याचे थेंब सतत खाली पडतात. गुहेतील अत्यंत कमी तापमानामुळे हे थेंब गोठतात. अशा प्रकारे बर्फाचे थर एकावर एक साचत जातात आणि नैसर्गिक शिवलिंगाची निर्मिती होते.
विशेष म्हणजे, हे शिवलिंग चंद्राच्या कलांनुसार आकाराने वाढते आणि कमी होते. पौर्णिमेला ते मोठे दिसते, तर अमावास्येला त्याचा आकार लहान होतो. त्यामुळे आकारातील बदल हा नैसर्गिक आहे. मात्र, दरवर्षी अधिक लवकर वितळणे ही चिंतेची बाब मानली जात आहे.
२००० वर्षांचा इतिहास काय सांगतो?
राजतरंगिणी या प्राचीन ग्रंथात अमरनाथ यात्रेचा उल्लेख आढळतो. त्या काळातील राजे येथे पूजा करत असल्याचे वर्णन आहे. तसेच आईन-ए-अकबरीमध्येही या यात्रेचा उल्लेख सापडतो. स्वामी विवेकानंदांनीही अमरनाथचे दर्शन घेतल्याची नोंद आहे.
हजारो वर्षांत अनेक राजवटी आल्या-गेल्या, पण बाबा बर्फानी दरवर्षी प्रकट होत राहिले. त्यामुळे आता शिवलिंग इतक्या वेगाने का वितळत आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
वाढती गर्दी आणि विकासकामांचा परिणाम?
पूर्वी अमरनाथ यात्रा ही कठोर तपश्चर्येप्रमाणे मानली जात होती. आज मात्र ती तुलनेने अधिक सोयीस्कर झाली आहे. गुहेजवळपर्यंत लंगर, वाहतूक आणि इतर सुविधा उपलब्ध आहेत.
तज्ज्ञांच्या मते, लाखो भाविकांच्या शरीरातून निर्माण होणारी उष्णता, वाहनांचा आणि जनरेटरचा धूर तसेच परिसरातील वाढते प्रदूषण यांचा शिवलिंगावर परिणाम होऊ शकतो. बर्फावर साचणारी धूळ आणि घाण यामुळेही वितळण्याची प्रक्रिया वेगाने होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
आकडे काय सांगतात?
२०१३ : यात्रा संपण्यापूर्वीच शिवलिंग वितळले.
२०१६: केवळ १० दिवस दर्शन झाले.
२०१८: २९ दिवस दर्शन झाले.
२०२२: फक्त १८ दिवस दर्शन मिळाले.
२०२४: अवघे ७ दिवस शिवलिंग दर्शनासाठी उपलब्ध होते.
२०२६: यंदा केवळ ५ दिवस दर्शन झाले.
याशिवाय, हिमलिंगाची उंचीही पूर्वीच्या सुमारे २२ फूटांवरून आता सुमारे १२ फूटांपर्यंत घटल्याचे सांगितले जाते.
देव रागावले आहेत की निसर्गाचा इशारा?
काही जण याला भगवान शंकरांचा कोप मानतात, तर काहींच्या मते हा हवामान बदलाचा (Climate Change) परिणाम आहे. सनातन परंपरेनुसार शिव आणि निसर्ग हे एकरूप मानले जातात. त्यामुळे निसर्गाचे नुकसान झाले, तर त्याचा परिणाम केवळ पर्यावरणावरच नव्हे, तर श्रद्धा आणि आस्थेवरही होतो.
उपाय काय?
यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मर्यादित ठेवावी.
प्लास्टिकच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालावी.
अमरनाथ गुहेजवळील बांधकामांवर कठोर नियंत्रण ठेवावे.
लक्षात ठेवा: "बर्फ वाचवणे हीच खरी शिवभक्ती आहे."