Ajit Pawar plane crash controversy
नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी नव्याने प्रश्न उपस्थित करत आमदार रोहीत पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणात पायलटला बळीचा बकरा बनवले जात असून काही प्रभावशाली लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणाचा तपास स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
रोहित पवार म्हणाले की, अजित पवारांना न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या प्रकरणात मोठा दबाव निर्माण झाल्याचे दिसत आहे. पायलटवर दोष टाकण्याचा प्रयत्न होत असून प्रत्यक्षात त्याला बळीचा बकरा बनवले जात आहे.
त्यांनी आरोप केला की, V. K. Singh यांनी पायलटवर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. अपघाताच्या वेळी दृष्यमानता (व्हिजिबिलिटी) कमी असल्याची माहिती पायलटने आधीच दिली होती. मात्र त्यावेळी ‘तू टेकऑफ घे, नंतर पाहू’ असे सांगण्यात आले होते, असा दावा त्यांनी केला.
रोहित पवारांनी सांगितले की, अपघातानंतर पायलटच्या रक्ताची तपासणी करण्यात आली आणि त्यात दारू किंवा कोणतेही विषारी पदार्थ आढळले नाहीत. त्यामुळे पायलटवर दबाव टाकला गेला होता का, असा प्रश्न उपस्थित होतो. मग पायलटवरच जबाबदारी का टाकली जात आहे आणि V. K. Singh यांना का वाचवले जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
याचबरोबर अजित पवारांचे विमान “अपघाताने पडले की पाडले गेले?” याचे स्पष्ट उत्तर मिळाले पाहिजे, असेही ते म्हणाले. या प्रकरणात काही मोठ्या आणि प्रभावशाली लोकांचा दबाव असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
रोहित पवारांनी आणखी एक दावा करत सांगितले की, रोहित सिंग यांच्या लग्नसमारंभात अनेक मोठे आणि प्रभावशाली नेते उपस्थित होते. त्या कार्यक्रमात गायक Yo Yo Honey Singh यांनी गाणेही सादर केले होते. या कार्यक्रमात Praful Patel यांच्यासह अनेक मोठे नेते उपस्थित होते, असा दावा त्यांनी केला.
या संदर्भात त्यांनी प्रफुल्ल पटेल यांना विनंती केल्याचे सांगितले की, त्या पार्टीत नेमके कोण-कोण उपस्थित होते, याची माहिती त्यांनी द्यावी. त्या कार्यक्रमात खूप प्रभावशाली लोक उपस्थित होते आणि तेच रोहित सिंग यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दृष्यमानता ५ हजार मीटरपेक्षा कमी नव्हती, असे सांगितले जात असताना टेकऑफ घेण्याचा सल्ला कोणी दिला? यामागे दबाव होता का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच एस. एन. शर्मा हे प्रफुल्ल पटेल यांच्या जवळचे व्यक्ती असल्याचा उल्लेखही त्यांनी केला.
अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआय कडे देण्याची मागणीही रोहित पवारांनी पुन्हा एकदा केली. मात्र ही मागणी स्वीकारली जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
दरम्यान, भाजपचे काही मोठे नेते मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत असल्याचाही आरोप त्यांनी केला. रोहित सिंग यांच्या लग्नाला कोण-कोण उपस्थित होते याची नावेही माझ्याकडे आहेत आणि वेळ आल्यास ती सांगू शकतो, असा इशाराही रोहित पवारांनी दिला.
रोहित पवार म्हणाले की, रोहित सिंग यांच्या लग्नाला अनेक मोठे नेते उपस्थित होते. एन चंद्राबाबू नायडू हे स्वतः त्या लग्नाला गेले होते. त्यांच्या सोबत के. राममोहन नायडू देखील उपस्थित होते. त्यामुळे संबंधितांमध्ये वैयक्तिक संबंध असल्याचे स्पष्ट होते. अशा प्रकारचे संबंध असल्यामुळे अजित पवारांना न्याय मिळण्यास अडथळे निर्माण होत असल्याची शंका त्यांनी व्यक्त केली.
रोहित पवारांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावरही प्रश्न उपस्थित केले. घाटकोपर येथे विमान कोसळले होते, तेव्हा किरीट सोमय्या यांनी एफआयआर दाखल केला होता. मग आता या प्रकरणात एफआयआर का दाखल करत नाहीत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
याबाबत प्रफुल्ल पटेल यांना रोहित सिंग आणि इतरांमधील संबंधांची माहिती होती, असा दावा करत रोहित पवार म्हणाले की, आम्ही प्रफुल्ल पटेल यांच्या पत्रकार परिषदेसाठी थांबलो आहोत. ते या संदर्भात काय भूमिका मांडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाची माहिती जय पवार यांच्याकडे असल्याचे सांगत पवार म्हणाले की, योग्य वेळी ती माहिती ते पुढे आणतील.