भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल. File Photo
राष्ट्रीय

Ajit Doval | अजित डोवाल मोबाईल फोन आणि इंटरनेट का वापरत नाहीत? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी स्वत:च केला उलगडा !

'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग'च्‍या उद्घाटन सत्रात तरुणाईशी साधला संवाद

पुढारी वृत्तसेवा

Ajit Doval on mobile phone, internet

नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल हे त्यांच्या दैनंदिन कामकाजात मोबाईल फोन किंवा इंटरनेटचा वापर करत नाहीत. याबाबत शनिवारी (दि. १०) 'विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग २०२६' च्या उद्घाटन सत्रात तरुणांशी संवाद साधताना त्यांनी याचा उलगडा केला. भारत मंडपम येथे आयोजित या कार्यक्रमात प्रश्नोत्तरांच्या सत्रादरम्यान, त्यांना विचारण्यात आले की, 'तुम्ही मोबाईल आणि इंटरनेट वापरणे टाळता हे खरे आहे का?' यावर उत्तर देताना माजी गुप्तचर आणि कायदा अंमलबजावणी अधिकारी असलेल्या डोवाल यांनी दुजोरा दिला.

मी इंटरनेट वापरत नाही हे खरे आहे...

यावेळी अजित डोवाल म्‍हणाले की, "मी इंटरनेट वापरत नाही हे खरे आहे. मी फोनचा वापर देखील टाळतो. केवळ कौटुंबिक बाबींसाठी किंवा इतर देशांतील लोकांशी संवाद साधण्यासाठी, जिथे अत्यंत आवश्यक असते तिथेच मी फोन वापरतो. मी माझे काम अशाच पद्धतीने व्यवस्थापित करतो. संवादाची इतर अनेक साधने उपलब्ध आहेत आणि काही अतिरिक्त पद्धतींची व्यवस्था करावी लागते, ज्याबद्दल लोकांना माहिती नसते.", असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

भारताचे 'जेम्स बाँड' अजित डोवाल

अजित डोवाल हे भारताचे पाचवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत. केरळ केडरचे सेवानिवृत्त आयपीएस (IPS) अधिकारी असलेल्या डोवाल यांनी अनेक दशके गुप्तचर यंत्रणा, अंतर्गत सुरक्षा आणि दहशतवादविरोधी कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.१९४५ मध्ये उत्तराखंडमध्ये जन्मलेल्या डोवाल यांनी १९६८ मध्ये पोलीस सेवेत प्रवेश केला. शौर्याबद्दलचा 'कीर्ती चक्र' पुरस्कार मिळवणारे ते सर्वात तरुण पोलीस अधिकारी ठरले.

भारतातील बंडखोरीविरोधी मोहिमांमध्ये मोलाची कामगिरी

अजित डोवाल यांनी मिझोराम, पंजाब आणि ईशान्य भारतातील बंडखोरीविरोधी मोहिमांमध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे. २०१६ चे सर्जिकल स्ट्राईक आणि २०१९ चे बालाकोट एअरस्ट्राईक यांसारख्या मोठ्या राष्ट्रीय सुरक्षा निर्णयांमध्ये त्यांची भूमिका महत्त्‍वपूर्ण होती. डोकलाममधील पेचप्रसंग हाताळणे आणि भारताची अंतर्गत सुरक्षा धोरणे निश्चित करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

पाकिस्‍तानमध्‍ये राहून विशेष कामगिरी

१९९९ मधील 'आयसी-८१४' विमान अपहरण संकटावेळी कंदाहार येथे वाटाघाटी करणाऱ्या पथकात ते सामील होते. १९७१ ते १९९९ या काळात त्यांनी विमानांच्या अपहरणाची अनेक प्रकरणे यशस्वीपणे हाताळली. विशेष म्हणजे, त्यांनी अनेक वर्षे पाकिस्तानात 'अंडरकव्हर' (गुप्तवेषात) राहून काम केले आहे. विशेष म्‍हणजे. सोशल मीडियापासून लांब गेल्या वर्षी, सरकारने डोवाल यांच्या नावाने फिरत असलेली एक बनावट फेसबुक पोस्ट उघडकीस आणली होती. त्या पोस्टमध्ये पाकिस्तानकडून सायबर हल्ला होणार असल्याचा खोटा इशारा देण्यात आला होता. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने (PIB) स्पष्ट केले होते की, अजित डोवाल यांचे कोणतेही अधिकृत फेसबुक खाते नाही आणि त्यांच्या नावाने पसरत असलेला मजकूर पूर्णपणे बनावट आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT