कोलकाता: पश्चिम बंगालमधील दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेल्या कथित प्राणघातक हल्ल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण कमालीचे तापले आहे.
सोनारपूर येथे निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसेतील पीडित कुटुंबांची भेट घेण्यासाठी बॅनर्जी गेले असताना त्यांच्यावर शनिवारी (30 मे) दगड, विटा आणि अंडी फेकून हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात बॅनर्जी यांच्या डोळ्याला दुखापत झाली आहे.
या घटनेविरोधात आता ते लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे दाद मागणार असून न्यायालयातही याचिका दाखल करणार असल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सोमवारी सांगितले.
अभिषेक बॅनर्जी यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. हा हल्ला भाजप पुरस्कृत असून माझ्या जीवाला धोका निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता, असे ते म्हणाले. तसेच स्थानिक पोलिसांनी त्यांना पुरेशी सुरक्षा दिली नसल्याचा आरोपही त्यांनी केला.
भाजपचे प्रत्युत्तर, पाचजणांना अटक
या घटनेनंतर पोलिसांनी कारवाई करत आकाश गायेन, काजळ दास, देवाशिष दत्ता, निर्मल्या सेनगुप्ता आणि तपन मैती अशा पाचजणांना अटक केली असून सोमवारी त्यांना बारुईपूर न्यायालयात हजर करण्यात आले.
दुसरीकडे, भाजपने या हल्ल्याचा निषेध केला असला तरी हा जनतेचा तृणमूल काँग्रेसवरील राग असल्याचे म्हटले आहे. पश्चिम बंगालचे मंत्री व भाजप नेते दिलीप घोष म्हणाले, कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. परंतु गेल्या 15 वर्षांत जनतेचा झालेला छळ आणि निर्माण झालेला संताप अशा स्वरूपात बाहेर पडत आहे.