Abhijeet Dipke File photo
राष्ट्रीय

Abhijeet Dipke: "महिन्यापूर्वी तर मी देशद्रोही होतो?" आठवलेंच्या 'एनडीए'च्या ऑफरवर अभिजित दिपके यांचा खोचक टोला

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) मध्ये प्रवेशाच्या ऑफरवर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी अत्यंत खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे.

मोहन कारंडे

Abhijeet Dipke

नवी दिल्ली: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (अ) मध्ये प्रवेशाच्या ऑफरवर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी अत्यंत खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या आठवले गटाच्या या अमंत्रणावर, "फक्त एका महिन्यापूर्वी मी तुमच्यासाठी देशद्रोही नव्हतो का?" असा सवाल दिपके यांनी विचारला आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऑफर

भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये सामील होण्याची ऑफर दिपके यांना दिली आहे. सोमवारी माध्यमांशी बोलताना रामदास आठवले यांनी अभिजित दिपके यांना आरपीआय (अ) मध्ये सामील होण्याचे आवाहन केले होते. आठवले म्हणाले की, "अभिजित दिपके हे आंबेडकरी विचारांचे, तरुण आणि सक्रिय कार्यकर्ते आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि समाज संघटित करण्यासाठी त्यांनी आमच्या पक्षात यावे. चुकीचे काम करणाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे यावर आमच्या सरकारचा विश्वास आहे, त्यामुळे त्यांनी सत्ताधारी पक्षात सामील व्हावे."

संघप्रमुखांच्या विधानाचा दाखला देत भाजपवर निशाणा

दिपके यांनी इन्स्टाग्रामवर एक स्क्रीनशॉट शेअर करत सवाल उपस्थित केला आहे. यापूर्वी ७ ऑगस्ट रोजी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या विधानाचा हवाला देत भाजप नेत्यांवर टीका केली होती. भागवत यांनी 'आंदोलन करणाऱ्या Gen Z पिढीला देशद्रोही म्हणणे योग्य नाही' असे विधान केले होते. याचा उल्लेख करत दिपके म्हणाले होते की, "मोहन भागवत यांचे विधान अत्यंत महत्त्वाचे आहे. पण भाजपनेत्यांनीही हे लक्षात ठेवले पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांनी विद्यार्थ्यांना 'दहशतवाद्यांची बी-टीम' म्हटले होते, तर नितीन नवीन यांनी त्यांना 'व्हायरस' ठरवले होते. आता तरी हे नेते मोहन भागवत यांचे ऐकतील, अशी आशा आहे."

जंतर-मंतर आंदोलन अन् केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा

गेल्या महिन्यात जंतर-मंतरवर पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा या मुद्द्यांवरून विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन उभारले होते. कॉकरोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या तीव्र दबावापोटी २५ जुलै रोजी तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता.

राजीनामा देताना प्रधान यांनी देशविरोधी शक्तींवर निशाणा साधला होता. "देशविरोधी शक्ती या आंदोलनाचा गैरफायदा घेऊ नयेत आणि विद्यार्थ्यांचे भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकू नये, यासाठी मी राजीनामा देत आहे," असे त्यांनी स्पष्ट केले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT