Raghav Chadha AAP Exit: आम आदमी पक्षात मोठी फूट पडल्याचे चित्र समोर आले असून त्यानंतर लगेचच आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण तापले आहे. राघव चढ्ढा, अशोक मित्तल, संदीप पाठकयांच्यासह आणखी काही खासदारांनी AAP सोडत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. या घडामोडीनंतर AAP ने त्यांच्यावर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे.
AAP चे वरिष्ठ नेते संजय सिंह यांनी या नेत्यांना थेट “गद्दार” असे संबोधले. “पंजाब कधीही या सात गद्दारांना माफ करणार नाही. त्यांनी जनतेच्या पाठीत खंजीर खुपसला आहे,” असे त्यांनी संतप्तपणे म्हटले.
याचवेळी त्यांनी भाजपवरही गंभीर आरोप केले. भाजप ‘ऑपरेशन लोटस’ राबवत असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली पंजाब निवडणुकीआधी AAP तोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
संजय सिंग यांनी असा दावा केला की, या सात बंडखोर खासदारांमध्ये हरभजन सिंग आणि स्वाती मालीवाल यांचाही समावेश आहे. त्यांनी भाजपवर “संघटित भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देणारा पक्ष” असल्याचा आरोप करत या नेत्यांनी त्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याबद्दल टीका केली.
दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना राघव चढ्ढा यांनी आपल्या निर्णयामागील भूमिका स्पष्ट केली. “मी पक्षाच्या कारवायांपासून दूर गेलो कारण मला त्यांच्या कथित चुकीच्या कृत्यांचा भाग व्हायचे नव्हते. मी त्यांच्या ‘गुन्ह्यां’चा भाग नव्हतो, म्हणून त्यांच्या जवळ राहण्यास पात्रही नव्हतो,” असे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, “आमच्यासमोर दोनच पर्याय होते, राजकारण सोडून गेल्या 15-16 वर्षांची मेहनत वाया घालवणे, किंवा सकारात्मक राजकारणासाठी पुढे जाणे. आम्ही दुसरा मार्ग निवडला आहे.”
राघव चढ्ढा यांनी स्पष्ट केले की राज्यसभेतील AAP चे दोन-तृतीयांश सदस्य भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार भाजपमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेत आहेत. या संपूर्ण घडामोडीमुळे पंजाबसह राष्ट्रीय राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर याचे परिणाम दूरगामी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.