जयपूर-अजमेर महामार्गावर गॅस वाहून नेणाऱ्या टँकरची इतर अनेक वाहनांना धडक बसल्याने भीषण अपघात झाला.  (Image source- ANI)
राष्ट्रीय

जयपूर : LPG गॅस टँकरच्या अपघातानंतर अग्नितांडव, ९ जणांचा होरपळून मृत्यू, ४१ जखमी

Jaipur Petrol Pump Fire | जयपूर-अजमेर महामार्गावरील घटना

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : जयपूर-अजमेर महामार्गावरील (Jaipur Petrol Pump Fire) पेट्रोल पंपाजवळ आज एलपीजी गॅस वाहून नेणाऱ्या टँकरची इतर अनेक वाहनांना धडक बसल्याने भीषण अपघात झाला. या अपघातानंतर लागलेल्या भीषण आगीत किमान ९ जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर ४१ जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. तर या आगीत सुमारे ४० वाहने जळून खाक झाली आहेत. ही आग इतकी भीषण होती की ती लगेच जयपूर शहरातील भांकरोटा भागातील पेट्रोल पंपापर्यंत पसरली, असे पोलिसांनी सांगितले.

अपघातस्थळावरून जयपूरचे पोलीस आयुक्त बिजू जॉर्ज जोसेफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, टक्कर झाल्यामुळे एलपीजी ट्रकच्या आउटलेट नोजलचे नुकसान झाले. यामुळे गॅस गळती होऊन आग लागली.

या आगीत पंपावर उभी असलेली अनेक वाहने जळून खाक झाली. ही आग अग्निशमन दलाच्या सुमारे २० गाड्यांनी आणण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर पोलिसांनी जखमींना जयपूरमधील सवाई मानसिंग रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

पेट्रोल पंप आगीच्या भक्ष्यस्थानी

पेट्रोल पंपातून मोठ्या प्रमाणात आगीच्या ज्वाळा निघत असल्याचे दृश्य दिसून आले आहे. या भीषण दुर्घटनेनंतर राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा (Bhajanlal Sharma) यांनी सवाई मानसिंग हॉस्पिटलला भेट देत जखमींवर सर्वोतोपरी उपचार करण्याचे निर्देश दिले. जयपूर-अजमेर राष्ट्रीय महामार्गावरील (Jaipur-Ajmer highway) अपघातानंतर गॅस टँकरला लागलेल्या आगीत नागरिकांचा मृत्यू झाल्याची दु:खद बातमी ऐकून खूप दुःख झाले. घटनास्थळी प्रशासनाकडून बचावकार्य सुरू आहे. स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन सेवा पूर्ण तत्परतेने काम करत आहेत, असे राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी X ‍‍वरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

ट्रक आणि सीएनजी कंटेनरची धडक होऊन अपघात

राजस्थानचे मंत्री जवाहर सिंह बेढम यांनी सांगितले, "आम्ही हॉस्पिटलमध्ये एक आयसीयू बनवला आहे. प्रथमदर्शनी असे दिसते की ट्रक आणि सीएनजी कंटेनरची धडक होऊन हा अपघात झाला. या दुर्घटनेत जीवितहानी झाली आहे. प्रशासन घटनास्थळी आहे. मृतांच्या कुटुंबीयांना सरकार आवश्यक ती मदत करेल..."

पीएम मोदी यांच्याकडून मृतांच्या कुटुंबियांना २ लाखांची मदत जाहीर

राजस्थानमधील जयपूर-अजमेर महामार्गावर झालेल्या अपघातातील जीवितहानीच्या घटनेबद्दल पीएम मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) २ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींना ५० हजार देणार असल्याचे म्हटले आहे. 'मृतांच्या कुटुंबियाप्रति माझ्या संवेदना. जखमी लवकर बरे व्हावेत, ही माझी प्रार्थना. स्थानिक प्रशासन अपघातग्रस्तांना मदत करत आहे.' असे त्यांनी X ‍वरील पोस्टमध्ये म्हटले आहे. दरम्यान, या आगीच्या घटनेबाबत पीएम मोदी यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्याशीही चर्चा केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT