पुणे; पुढारी वृत्तसेवा : 'बेडूक उड्या बंद करा' असे खोचक सल्ले नागरिकांनी राजकीय नेत्यांना मनसेच्या 'एक सही संतापाची' या मोहिमेतून दिले. राज्यातील राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर मनसे आक्रमक होत आहे. राजकीय परिस्थितीवर भाष्य करणारी 'एक सही संतापाची' ही मोहीम पक्षाने राज्यभर राबविली आहे. पुण्यात वडगाव शेरी मतदारसंघात गाडीतळ, कसब्यामध्ये शनिपार चौक, पर्वती, स्वारगेट येथे, तर कोथरूड येथे शिवाजी पुतळ्याजवळ ही मोहीम पार पडली.
मोठ्या फलकावर सही करून, आपले मत महाविद्यालयीन तरुण, तरुणी, सामान्य नागरिक, गृहिणी, ज्येष्ठ नागरिक, रिक्षावाले, व्यावसायिक सध्या सुरू असलेल्या राजकारणाच्या विरोधात संताप व्यक्त केला. रविवारी कॅन्टोन्मेट, शिवाजीनगर, हडपसर, खडकवासला या मतदारसंघात मोहीम राबविली जाणार आहे.
राजकारणाचा चिखल झाला आहे का ? या घटनांचा तुम्हाला राग येत नाही का ? चीड येत नाही का ? माझ्या मताला काही किंमत नाही का ? असे विविध प्रश्न या फलकावर झळकवून नागरिकांना सही करण्याचे आवाहन केले जात आहे. यासंदर्भात मनसेचे नेते बाबू वागसकर म्हणाले, केवळ पुण्यातच नाही, तर सातारा, सांगली आदी पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांत ही मोहीम राबविली जात आहे.
त्याला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. राजकीय वातावरणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलीन झाली आहे. त्याचा राग नागरिक व्यक्त करीत आहेत." मनसे कोथरूड विभागाचे अध्यक्ष सुधीर धावडे म्हणाले, 'नागरिकांचा प्रतिसाद हा उत्स्फूर्त असून, केवळ सहीच नाही, तर नागरिक त्यांचे परखड मतही नोंदवीत आहेत.'
हेही वाचा