Latest

महावितरणचे 12 हजार मेगावॅटसाठी करार

अमृता चौगुले

पुणे : राज्यातील विविध प्रकारच्या वीज ग्राहकांना रोज किमान 18 ते 20 हजार मेगावॅट विजेची गरज आहे. या उत्पादित विजेपैकी जास्तीत जास्त वीज ही कोळसा, औष्णिक वीज प्रकल्पाच्या माध्यमातून मिळत आहे. आता अपारंपरिक स्रोतामधून वीज मिळण्यासाठी महावितरणने विविध संस्थांशी 12 हजार 929 मेगावॅट वीज निर्मितीचे करार केले आहेत. या संस्थांची वीज उत्पादनाची क्षमता किमान 9 हजार 911 मेगावॅट एवढी आहे.

नैसर्गिक वातावरणाप्रमाणे यातून मिळणारी वीज ही हंगामी स्वरूपाची आहे. त्यामुळे या विजेच्या दैनंदिन उपलब्धतेमध्ये मोठी तफावत राहणार आहे. परिणामी महावितरणला पारंपरिक अपारंपरिक ऊर्जा स्रोतमधून मिळणार्‍या विजेला भविष्यात मर्यादा निर्माण होणार आहेत. तसेच या अपारंपरिक स्रोतामधून मिळणार्‍या विजेचे दरही खूप जास्त आहेत. महावितरणने शेतकर्‍यांना दिवसा वीज मिळावी यासाठी मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजना 2 सुरू केली आहे.

सौर ऊर्जेवर आधारित ही योजना असून 2025 सालापर्यंत 7 हजार मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. त्यामार्फत राज्यातील 30 टक्के शेतकर्‍यांना म्हणजेच 19 ते 20 लाख शेतकर्‍यांना वीज उपलब्ध होणार आहे. राज्यात घरगुती, औद्योगिक तसेच वाणिज्यिक असे वीज ग्राहक आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कोळसा निर्मित वीज प्रकल्पातून वीज निर्माण होत आहे. मात्र यामुळे प्रदूषण वाढत असल्याने महावितरणने भविष्याचा विचार करून नवीन व नवीनीकरण ऊर्जेवर भर दिलेला आहे. मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजना 2 याची राज्यात अतिशय प्रभावी अंमलबजावणी होणार असून 2025 पर्यंत सुमारे 7 हजार मेगावॅट निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे.

मे 2023 अखेर 2 हजार मेगावॅट क्षमतेचे करार करण्यात आले आहेत. त्यापैकी 600 मेगावॅट क्षमता कार्यान्वित झालेली आहे. यामुळे राज्यातील सुमारे 325 वीज वाहिन्यांवरील अंदाजे 1 लाख शेतकर्‍यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. दरम्यान, डिसेंबर 2025 अखेर राज्यातील 30 टक्के (म्हणजेच किमान 18 ते 20 लाख शेतकरी) सध्या राज्यात 48 ते 50 लाख शेतकरी कृषी ग्राहक असून, त्यापैकी 18 ते 20 लाख शेतकर्‍यांना मुख्यमंत्री सौर कृषी योजनेअंतर्गत दिवसा वीज मिळणार आहे.

18 ते 20 लाख शेतकर्‍यांना लाभ
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीतून मिळणार्‍या योजनेचा लाभ राज्यातील केवळ शेतकर्‍यांनाच होणार आहे. परिणामी शेतकर्‍यांना दिवसा वीज उपलब्ध होणार आहे. दरम्यान इतर कोळसा, पाणी आणि औष्णिक या प्रकल्पामधून तयार होणार्‍या विजेचा वापर घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक आस्थापना यांना होणार आहे. ही बाब लक्षात घेऊनच महावितरणने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2 ही योजना सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याच्या माध्यमातून राज्यात सध्या असलेल्या 48 ते 50 लाख शेतकर्‍यांपैकी 18 ते 20 लाख शेतकर्‍यांना सौर ऊर्जेचा (अपारंपरिक ) लाभ होणार आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT