यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा : वणीवरून मारेगावाकडे येणाऱ्या दुचाकीस्वार दोन मित्रांचा अपघात होऊन दोघेही गंभीर जखमी झाले होते. दरम्यान, पाच दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या या दोन मित्रांचे शनिवारी पहाटे नागपूर येथे उपचारादरम्यान निधन झाले. या घटनेमुळे तालुक्यातील पहापळ या गावात शोककळा पसरली आहे.
विजय संभाजी थेरे (वय ३५), नितीन खुशाल पायघन (वय २८) अशी मृतांची नावे असून, हे दोघे मारेगाव तालुक्यातील पहापळ येथील रहिवासी आहेत. हे दोघेही मित्र दुचाकीने (एमएच ३१ - एच ३४०) वणीवरून ७ जानेवारी रोजी मंगळवारी रात्री १० च्या सुमारास मारेगावकडे येत होते. निंबाळा गावाजवळ राज्य महामार्गांवर वन्यप्राणी अचानक आडवे आल्याने जबर धडक होऊन दोघेही गंभीर जखमी झाले. या दोघांवरही नागपूर येथे गेल्या पाच दिवसांपासून उपचार सुरू होते.
मात्र, कोमात असलेल्या या दोन तरुणांनी पाच दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शनिवारी पहाटे विजय याने अखेरचा श्वास घेतला. काही वेळातच नितीन याचाही मृत्यू झाला. या घटनेचे वृत्त गावात पोहोचताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली. विजय थेरे याच्यामागे आई, पत्नी व सहा वर्षांची मुलगी आहे. तर नितीन पायघन हा अविवाहित होता. नितीन याच्या पश्चात आई-वडील व बहीण आहे.