यवतमाळ, पुढारी वृत्तसेवा : वरुडखेड येथे गावातील पाणंद रस्ता करताना कोणतीही अडचण होवू नये, यासोबतच देयक वेळेवर काढण्यासाठी सरपंच आणि उपसरपंचानी ठेकेदाराकडे दीड लाख रुपयांची मागणी केल्याची घटना उघडकीस आली. हा प्रकार दारव्हा तालुक्यातील वरुडखेड ग्रामपंचायतीत घडला. याप्रकरणी सरपंच, उपसरपंचासह पाचजणांवर एसीबीने गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी सरपंच निलेश प्रकाश राऊत (वय.35), उपसरपंच गजानन तुळशीराम मनवर (वय.40), रमेश आनंदराव कुटे (वय.62, तिघे रा. वरुडखेड), मुकुल घनश्याम राऊत (वय.28, रा. कारंजा लाड), घनश्याम बाबाराव राऊत (रा. कारंजा लाड) असे गुन्हे दाखल झालेल्याची नावे आहेत. एसीबीकडे तक्रारदाराने (दि.3) जूनला तक्रार दिली होती. यानंतर एसीबीच्या पथकाने त्यांच्या तक्रारीची पडताळणी केली.
दीड लाखांपैकी अर्धी रक्कम 75 हजार रुपये शनिवारी (दि.8) दुपारी बोदेगाव येथे हार्डवेअर दुकानात स्वीकारले होते. त्यानंतर लाच देण्यासाठी तक्रारदाराने नीलेश राऊत याच्यासह पाचजणांसोबत तडजोड केली. यानंतर एसीबी पथकाने बोदेगाव येथील गौरी हार्डवेअर येथे सापळा रतला. दरम्यान सरपंच, उपसरपंच यांच्या सांगण्यावरून हार्डवेअर चालक मुकुल राऊत याने एसीबी पथकासमक्ष 75 हजारांची लाच घेतली. त्यानंतर एसीबीचे पोलिस निरीक्षक अमित वानखडे यांनी दारव्हा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी 5 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास एसीबीचे पथक करीत आहे.