यवतमाळ : पुढारी वृत्तसेवा
गोरज येथे काम आटोपून घरी येत असताना शेतकरी महिलेच्या अंगावर वीज पडून तिचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि.30) घडली. निर्मला किसन आत्राम (वय. ३५) असे मृत महिलेचे नाव आहे. त्या पती आणि दोन मुलांसह मारेगाव तालुक्यातील खातेरा येथे वास्तव्यास होत्या. दोघेही मोलमजुरी व भाड्याने शेतीकाम करुन उदरनिर्वाह करत होते.
दरम्यान शुक्रवारी (दि.30) वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. निर्मला शेतातील काम आटोपून घरी येत होत्या. त्यावेळी वाटेतच त्यांच्या अंगावर विज कोसळली आणि त्या जागीच ठार झाल्या. घटनेची माहिती पोलीस पाटील प्रमोद ताजणे यांनी मारेगाव पोलीसांना दिली. माहिती प्राप्त होताच जमादार भालचंद्र मांडवकर हे घटनास्थळी पोहोचले.