Samruddhi Expressway Facilities Issues
अजय ढवळे
वाशीम : बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे राज्यातील विविध शहरांमधील प्रवासाचा वेळ मोठ्या प्रमाणात कमी झाला असला, तरी या महामार्गावर प्रवाशांना आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधांचा अभाव जाणवत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेषतः महामार्गावरील पेट्रोल पंपांवर इंधनाची सुविधा उपलब्ध असली, तरी प्रवाशांसाठी आवश्यक असलेल्या इतर सुविधांकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र काही ठिकाणी दिसून येत आहे.
समृद्धी महामार्गावरून दिवस-रात्र मोठ्या संख्येने वाहने धावत असतात. लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसह महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि कुटुंबांसह प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी पेट्रोल पंप हे महत्त्वाचे थांबे ठरतात. अशा परिस्थितीत पेट्रोल पंपांवर स्वच्छ व वापरण्यायोग्य स्वच्छतागृह, शुद्ध पिण्याचे पाणी, हवा, चार्जिंग पॉईंट,वाहनतळ, बसण्यासाठी किंवा विश्रांतीसाठी जागा, स्वच्छ परिसर आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध असणे अपेक्षित आहे.
मात्र, काही ठिकाणी या सुविधांची स्थिती समाधानकारक नसल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र आहे. विशेषतः महिला प्रवाशांना स्वच्छतागृहाच्या सुविधेचा प्रश्न अधिक गंभीर ठरतो. लहान मुलांसह प्रवास करणाऱ्या कुटुंबांनाही पिण्याचे पाणी आणि विश्रांतीच्या सुविधांची आवश्यकता भासते. महामार्गावर पर्यायी सुविधा मर्यादित असल्याने पेट्रोल पंपांवरील व्यवस्थेवरच प्रवाशांना अवलंबून राहावे लागते.
पेट्रोल पंपावर इंधन भरण्याची सुविधा देणे एवढीच जबाबदारी न राहता प्रवाशांच्या मूलभूत गरजांचाही विचार होणे आवश्यक आहे. महामार्गावरील प्रवाशांकडून इंधनासाठी पैसे घेतले जात असताना त्यांना किमान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित यंत्रणांनी काटेकोरपणे लक्ष देण्याची गरज आहे.
काही ठिकाणी स्वच्छतागृहांची उपलब्धता असली तरी त्यांची नियमित स्वच्छता, पाणी आणि देखभाल याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे केवळ कागदोपत्री सुविधा दाखविण्याऐवजी त्या प्रत्यक्षात प्रवाशांसाठी उपयोगी आहेत का, याची तपासणी होणे गरजेचे आहे.
समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपांवर प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांची संबंधित प्रशासनाने नियमित तपासणी करावी. स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी, पार्किंग, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक बाबींची पाहणी करून त्रुटी आढळल्यास संबंधितांना त्या तातडीने दूर करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
समृद्धी महामार्ग हा केवळ वेगवान प्रवासाचा मार्ग नसून प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी आणि सुविधायुक्त प्रवास मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे ‘समृद्धी’च्या मार्गावर प्रवाशांना मूलभूत सुविधांसाठी गैरसोय होणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणांनी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.