Washim Traffic Safety Drive
वाशिम : जिल्ह्यातील वाढते रस्ते अपघात रोखून रस्ते सुरक्षा अधिक प्रभावी करण्यासाठी वाशिम पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्तपणे कठोर कारवाई सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत प्राणांतिक अपघातांसाठी जबाबदार ठरलेल्या ३५ दोषी वाहनचालकांचे चालक परवाने निलंबित करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या प्राणांतिक अपघातांमध्ये १२८ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. या अपघातांच्या कारणांचा आढावा घेतला असता अनेक दुर्घटनांना वाहनचालकांचा भरधाव वेग, निष्काळजीपणा आणि बेदरकार वाहनचालकपणा कारणीभूत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अशा चालकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस आणि आरटीओ विभागाने संयुक्त मोहीम हाती घेतली आहे.
प्राणांतिक अपघात करणाऱ्या दोषी चालकांविरुद्ध यापुढेही कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई केली जाणार आहे. विशेषतः प्राणांतिक अपघातास कारणीभूत ठरणारे तसेच मद्यप्राशन करून वाहन चालविणारे चालक पोलिसांच्या रडारवर राहणार असून, त्यांच्याविरुद्ध कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यासोबतच चालक परवाना निलंबित किंवा रद्द करण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
रस्ते अपघातांमध्ये निष्पाप नागरिकांचे बळी जाण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, वेगमर्यादा पाळावी आणि कोणत्याही परिस्थितीत मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असे आवाहन वाशिम पोलीस प्रशासनाने केले आहे. स्वतःसह इतरांचा जीव सुरक्षित ठेवण्यासाठी जबाबदारीने वाहन चालवा, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.