वाशिम : जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांमार्फत वितरित होणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या तांदळाच्या पुरवठ्याविरोधात वाशीम जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार असोसिएशनने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत असोसिएशनच्या वतीने उपआयुक्त (पुरवठा), अमरावती यांना दि. २३ जुलै रोजी सविस्तर निवेदन देत गोंदियावरून होणारा तांदळाचा पुरवठा तात्काळ बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, वाशीम जिल्ह्यात गोंदिया येथून येणारा तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचा आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुरी, कचरा व चुरा असल्याने लाभार्थ्यांकडून वारंवार तक्रारी येत आहेत. यामुळे स्वस्त धान्य दुकानदार आणि कार्डधारकांमध्ये वाद निर्माण होत असून दुकानदारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
असोसिएशनने आरोप केला आहे की, एफसीआय गोदामातून तांदूळ उचलण्याच्या प्रक्रियेत अनियमितता होत आहे. दर्जेदार तांदळाऐवजी निकृष्ट दर्जाचा तांदूळ वाशीम जिल्ह्यात पाठविला जात आहे. त्यामुळे शासनाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेची प्रतिमा देखील मलिन होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यासोबतच ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यांचा धान्य साठा वेळेत उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच वाशीम एफसीआय गोदामातूनच तांदळाचा पुरवठा करण्याचे आदेश द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास वाशीम जिल्ह्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारधान्य उचलण्यास नकार देऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण आंदोलन छेडतील, असा इशाराही असोसिएशनने निवेदनातून दिला आहे. या निवेदनावर वाशीम जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष तान्हाजिराव काळे, तालुका अध्यक्ष प्रेमानंद सोमाणी, स्वस्त धान्य दुकानदार नारायण मुसळे, अभिजित चव्हाण, मदन सावके, रामकिसन बरडे, राम गाभने, सुनील सोमाणी, लाहोटी काका, विठल चवाळे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. सदर नित्कृष्ट दर्जाचा तांदूळ पुरवठा बंद न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा स्वस्त धान्य दुकानदारांनी यावेळी दिला आहे.