वाशिम

Washim news: अनसिंग बसस्थानकासमोर पाऊसाच्या पाण्याचे झाले ‘तळे'! प्रवाशांचे हाल

नागरिकांकडून प्रशासनाला आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे

पुढारी वृत्तसेवा

वाशिम : तालुक्यातील अनसिंग बसस्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून, या साचलेल्या पाण्याला अक्षरशः तळ्याचे स्वरूप आले आहे. या गंभीर समस्येमुळे नागरिक, प्रवासी, विद्यार्थी, व्यापारी, रुग्ण तसेच वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या समस्येवर तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते यश सतीश चव्हाण यांनी आज, सोमवार (दि. ३ ऑगस्ट २०२६) रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सविस्तर निवेदन सादर केले.

निवेदनाप्रमुख मुद्दे व वास्तव:

अनसिंग बसस्थानक हे परिसरातील महत्त्वाचे वाहतूक केंद्र असून येथून दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. मात्र, बसस्थानकासमोर पाणी साचल्याने संपूर्ण परिसर जलमय होतो. पादचाऱ्यांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागते. दुचाकीस्वारांचे अपघात होण्याच्या दाट शक्यतेसह वाहनांचेही नुकसान होत आहे. बसमध्ये चढणाऱ्या-उतरणाऱ्या प्रवाशांसह विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग व्यक्ती आणि शालेय विद्यार्थ्यांना मोठा नाहक त्रास सहन करावा लागतो. साचलेल्या पाण्यामुळे परिसरात अस्वच्छता पसरून डासांची उत्पत्ती होत आहे, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. ही समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना याच संकटाचा सामना करावा लागतो, असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रशासनाला आंदोलनाचा इशारा

संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून पाणी साचण्यामागील कारणांचा शोध घ्यावा आणि पाण्याचा कायमस्वरूपी निचरा होईल अशी तांत्रिक उपाययोजना त्वरित करावी, अशी आक्रमक मागणी करण्यात आली आहे. तसेच, निवेदन प्राप्त झाल्यापासून तीन दिवसांच्या आत कार्यवाही सुरू न झाल्यास अथवा ठोस निर्णय न घेतल्यास, नागरिकांच्या हितासाठी तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही सामाजिक कार्यकर्ते यश सतीश चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला आहे.

SCROLL FOR NEXT